नगर -करोनाच्या लढ्यात डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी,इतर खात्यातील अनेक कर्मचारी जीव धोक्यात घालुन आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण समाज व राष्ट्र घडवणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना काम देतांना मात्र, महाराष्ट्रात त्यांची हेळसांड होत आहे. त्यांनाही 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे अशी मागणी सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी केली आहे.
करोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने दारुच्या गुत्त्यासमोर तळीरामांची रांग व्यवस्थित करणेसाठी अनेक शिक्षकांना नेमणुक देणे. रेशन दुकानात दुकानदारावर नजर ठेवणे. जिल्हा व तालुका सिमांवर चेकपोस्टवर वाहतुक नियंत्रण करणे व अवैध वाहतुक थांबवणे. कॉरंटाईन ठिकाणी महिला शिक्षकांना रात्रीच्या ड्युट्या देणे. रेड झोन क्षेत्रात बाधित कुटुंब व इतर कुटुंबांना घरपोहोच किराणा, भाजीपाला पोहोच करणे. यासह अनेक कामे करण्यासाठी गुरुजी व ताईंची वेळेचे भान न ठेवता नेमणुका देऊन शिक्षकांची प्रतिष्ठा त्यांचा पेशा व जॉब चार्ट याचा काहीही विचार केला नाही.
जत तालुक्यात नानासाहेब गोरे नावाच्या शिक्षकाला चेकपोस्टवर ट्रकने चिरडले! गतप्राण झालेल्या शिक्षकाचे कुटुंब रस्त्यावर आले. कोविड अंतर्गत करोना ड्युटीवर असलेल्या शिक्षकांना 50 लाख विमा संरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा केला. मात्र,विमा संरक्षण देण्यास असमर्थता! मग शिक्षकांनी काम कुणाच्या भरवशावर करायचे हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षकाला 50 लाखांचे विमा संरक्षण मिळावे अशी, मागणी होत आहे.