– विजय शेंडगे
लहान मुलांच्या हाती कोणतं पुस्तक द्यावं? हा प्रश्न जेव्हा पालकांना पडेल, तेव्हा त्यांनी शिवाजी चाळक यांच्या “पाखरमाया’ या बालकविता संग्रहाचा प्राधान्याने विचार करावा. कारण यातल्या कविता अत्यंत बालसुलभ असून, लहान मुलांच्या सहज पचनी पडतील अशा आहेत. कविता तर उत्तम आहेतच; परंतु संपूर्ण पुस्तक सचित्र आहे. रंगदार असलेलं हे पुस्तक लहान मुलांना अगदी मनापासून आवडेल.
टीव्हीवरील कार्टून मालिकांमध्ये मुलं रमली की आईवडिलांना धन्य वाटतं; परंतु मुलांवर योग्य संस्कार करण्याची क्षमता कोणत्याही कार्टून मालिकांमध्ये नाही. त्यामुळे मुलांच्या हातात पुस्तक पडायलाच हवं. गरज असेल तेव्हा त्यांच्या कानाशी मोबाइल नव्हे, खुळखळाच वाजायला हवा.
एकेक कविता वाचत जाताना, साठी उलटून गेलेल्या चाळक सरांच्या मनात रांगणाऱ्या बालकृष्णाची अनुभूती येत जाते. ते अगदी सहजगत्या लहान मुलांच्या भावविश्वात रममाण होतात आणि इवल्या जीवांच्या भावना शब्दबद्ध करतात.
“सूर्य’ या पहिल्याच कवितेत कवी म्हणतो-
“लावतोस बॅटरी, सकाळी सकाळी
खिडकीत येतोस, उठायच्या वेळी’
“सुंदर माझी शाळा’ या कवितेत कवी म्हणतो-
“फुलविते संस्काराचा मळा
अशी आहे माझी सुंदर शाळा’
परंतु शाळेत गेल्यावरच संस्कार व्हायला हवेत, असं कोणी सांगितलं आहे. रांगणाऱ्या मुलासमोर पुस्तक ठेवलं तर ते पुस्तकसुद्धा त्या मुलावर निश्चित काही संस्कार करेल. “पाखरमाया’ या संग्रहातील बालकविता या निव्वळ शब्दांची उतरंड नाही. लहान मुलांवर संस्कार करण्याची क्षमता या कवितांमध्ये आहे.
दिवाळीचा किल्ला, बिबट्याचा प्रश्न, उन्हाळ्याची सुट्टी, मामाचा गाव, संध्याकाळ, अशा एकाहून एक सुंदर कविता पाखरमाया या संग्रहात आहे. लहान मुलांमध्ये कुतूहल निर्माण करण्यात, त्यांच्या विचारांना खाद्य पुरवण्यात या कविता यशस्वी होतील याविषयी शंका बाळगण्याचे काही कारण नाही.
यशोदीप पब्लिकेशनच्या रूपाली अवचरे आणि निखिल लंभाते यांनी हा बालकविता संग्रह परिपूर्ण होण्यासाठी पुरेशी मेहनत घेतली आहे. प्रदीप खेतमर यांनी रंगवलेली चित्रे अत्यंत समर्पक असून ती चित्रे कवितांना न्याय देतातच; परंतु मुलांच्या भावविश्वालाही न्याय देतात.
काव्यसंग्रहाच्या प्रत्येक पानात मुलांना आवडतील अशी रंगीत चित्रे आहेत. त्या चित्रांवर कविता लिहिल्या आहेत. चित्रांची रंगसंगती उठावदार असून ती रंगसंगती अत्यंत हलकी फुलकी आहे. चित्रांवरच्या कविता नजरेचा ठाव घेतात आणि वाचल्यावर मनाचाही ठाव घेतात. त्यामुळे रांगणाऱ्या मुलापासून प्राथमिक शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाच्या हातात हे पुस्तक असायलाच हवं.