सातारा (प्रतिनिधी) – करोनाचे वाढते संक्रमण व लॉकडाऊनमुळे सातारा जिल्हयाचा टूर व ट्रॅव्हल्स व्यवसायाचे पुरते कंबरडे मोडले आहे. वाहन विमा तयार ठेवून यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी सज्ज झालेल्या टुरिस्ट व्यावसायिकांची करोनाने पुरती अडचण केल्याने या व्यवसायाचे दोन महिन्यात दीडशे कोटीचे नुकसान झाले आहे.
रिक्षा व वडापची चाकेसुध्दा थांबल्याने जिल्हयाचा खासगी परिवहन व्यावसायिकांचा कणा मोडून पडला आहे. सातारा जिल्ह्यात खासगी परिवहनाच्या क्षेत्रातून मोठी उलाढाल होते. परिवहन विभागाच्या नोंदीनुसार साताऱ्यात 960 खासगी ट्रॅव्हल्स, 1100 खासगी टूरिस्ट, 4500 वडाप वाहने व 3500 रिक्षा व्यावसायिक आहेत. केवळ सातारा शहराचा टूरिस्ट व्यवसाय साधारण 500 कोटीच्या आसपास आहे. केवळ सातारा- मुंबई, सातारा- शिर्डी, सातारा- पंढरपूर, सातारा- पुणे व सातारा- बंगळुरू या पाच मार्गाचा व्यवसाय पाच कोटींचा असल्याचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सांगतात. मात्र, यंदा करोनामुळे उन्हाळी हंगामाचा सारा व्यवसाय पाण्यात गेल्याने व्यावसायिकांचे दहा कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मुख्यत्वे गोवा, केरळ, अलेप्पी, तिरुपती, पंढरपूर, तुळजापूर, अककलकोट, बंगळुरू, अर्काट, जिंजी या टूरिस्ट व्यावसायिकांसाठी ठेवणीतल्या सुपाऱ्या असतात. कोणतीही गाडी साधी व लक्झरीही अनुक्रमे नऊ किंवा अकरा रुपये किलोमीटरने धावते. त्यामुळे सर्व खर्च वजा जाता एका ट्रीपचे चार ते पाच हजार सहज मिळतात. मात्र, याच व्यावसायिक गुणाकारावर करोनाने गंडांतर आणल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. करंजे येथे एका व्यावसायिकाच्या तब्बल नऊ ट्रॅव्हल्स आहेत. एका ट्रॅव्हल्सचा हप्ता चाळीस हजाराचा व वार्षिक विमा 80 हजारांच्या घरात आहे. वाहनांच्या दुरुस्तीचे आकडे लाखांच्या घरात असताना सध्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून व्यावसायिकांना पैची कमाई नाही. शिवाय गाडीचा मेंटेनन्स, चालकाचा पगार व शिवाय बॅंकांचे हप्ते आणि त्याचे व्याज यामुळे टुरिस्ट व्यावसायिकांची आर्थिक टंचाई टोकाला गेली आहे.
चालकही बेकार
आजमितीला साताऱ्यात 250 हून अधिक कुशल चालक आहेत. मात्र, टूर्स व्यवसाय ठप्प झाल्याने दुसऱ्याच्या गाडीवर दहा ते बारा हजार रुपये वेतनावर काम करणारे चालक बेकार झाले आहेत. तब्बल 300 कुटंबे रस्त्यावर आल्याने त्यांची अडचण झाली आहे. आंतरजिल्हा प्रवासात पुणे, मुंबई येथे गाडी पाठवायची तर करोना संक्रमणाच्या भीतीने चालकांनीही गाडीपासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे. जादा शुल्क देऊनही पुणे, मुंबईच्या ट्रीपला चालक चक्क नकार देत आहेत.
करोनामुळे टुरिस्ट व्यावसायिकांची बेकारी वाढली आहे. बॅंकांच्या हप्त्यांचे टेन्शन आहेच. यामधून मार्ग काढणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. करोनाचा आर्थिक फटका कमीत कमी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी बसला आहे. किमान आणखी सहा महिने नागरिक पर्यटनांसाठी बाहेर पडतील की नाही अशा भीती आहे. त्यामुळे आमची आर्थिक गणिते आणखीनच बिघडणार आहेत.
– अजित कोळी, (टुरिस्ट व्यावसायिक, सातारा)