कराड (प्रतिनिधी) – कराड शहरात करोनाचा शिरकाव होणार नाही, या अनुषंगाने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद आहे. याच पार्श्वभूमीवर कराड पालिका “मी माझा रक्षक’ हे अभियान राबवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.
दरम्यान, शहरात स्वच्छता, आरोग्य या मोहीमा योग्य प्रकारे राबवल्या गेल्या आहेत. लॉकडाऊन व कंटेनमेंट झोनमध्ये कराडकरांची संयमताही महत्वपूर्ण ठरली असून करोनाच्या तीन साखळ्या तोडण्यात यश आल्याचे मत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात करोना प्रतिबंधक कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, गटनेते राजेंद्र यादव, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती किरण पाटील, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, हणमंतराव पवार, राजेंद्र माने, फारुख पटवेगार, महिला व बाल विकास सभापती स्मिता हुलवान, नगरसेविका शारदा जाधव, विद्या पावसकर, अंजली कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उत्तम दिघे म्हणाले, सध्या मुंबई-पुण्याहून शहरात येणाऱ्या लोकांमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यासह प्रमुख शहरांच्या ठिकाणी शहर समिती व प्रभागनिहाय उपसमिती स्थापन करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे जून-जुलै महिन्यात संक्रमण वाढण्याची शक्यता असून या लोकांवर शहर समितीने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ही समिती कार्यक्षम राहिल्यास करोना तालुक्याला स्पर्शही करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यशवंत डांगे म्हणाले, कराड शहरात लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी चांगले सहकार्य केले आहे. परंतु, लॉकडाऊन 4 चा टप्पा खरा कसोटीचा काळ आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर बाहेरून लोक शहरात येत आहेत. आतापर्यंत 510 लोकांची नोंद करण्यात आली आहे. त्यांना नगरपालिकेच्या शाळेमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच शहरातील अकरा पेठांमध्ये नगर शहर समितीची स्थापना करण्यात आली आहे. बाहेरून आलेल्या लोकांवर लक्ष ठेवणे गरजेचे असून त्यासाठी नगर शहर समित्यांची भुमिका महत्वाची राहणार आहे. त्यामुळे या समित्या व लोक प्रतिनिधींनी पालकत्वाची भूमिका बजावावी.
दरम्यान, सूचना मांडताना उपनगराध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, बाहेरून व ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या लोकांना तपासणी करण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर पाच ठिकाणी एन्ट्री पॉइंट बसवून चेकपोस्टची निर्मिती करण्यात यावी. तसेच नगरपालिका ती चेकपोस्ट उभारेल. त्याला प्रशासनाने सहकार्य करावे. तर विनायक पावसकर यांनी शहरातील भाजी मंडई एका ठिकाणी न भरवता पूर्वीप्रमाणे हॉकर्स धारकांना परवाने देऊन घरपोच भाजीपाला देण्यात यावा, अशी सूचना मांडली. या सूचनेला जोड देत विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी आपली सूचना मांडली.
प्रायोगिक तत्वावर चेकपोस्ट उभारणार
जिल्ह्याच्या तुलनेत कराडसारख्या ठिकाणी सर्व शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक व आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने याठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे याठिकाणी परराज्यातून येणाऱ्या लोकांची संख्याही मोठी असल्याने करोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. ही परिस्थिती गृहीत धरून पोलीस प्रशासनाने नगरपालिका व आरोग्य विभागासोबत उपाययोजना करताना काही ऍडव्हान्स गोष्टी केल्या. त्यामुळे करोनाच्या साखळ्या तोडण्यास प्रथमदर्शनी यश आले आहे. प्रशासनाने प्रवासी परवाने दिल्याने जिल्ह्या बाहेरून शहरात येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. हे लक्षात घेऊन सुरुवातीला शहरात प्रायोगिक तत्वावर चेकपोस्ट उभारून नंतर आवश्यकतेनुसार ती वाढवण्यात येतील. तसेच त्याचा फायदा बाहेरून येणाऱ्या लोकांच्या ट्रेसिंगसाठीही होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.