सांगली (प्रतिनिधी) – सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची खरिपासाठी लगबग सुरु झाली आहे. कृषी सेवा केंद्रांवर बी-बियाणे, खते, किटकनाशके घेण्यासाठी शेतकरी गर्दी करत असल्याने शेतकऱ्यांना आवश्यक ती बी-बियाणे, खते शेताच्या बांधावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे.
शेतकऱ्यांना आवश्यक तेवढी खते व बियाणे मिळवण्यासाठी कृषी अधिकारी बी. डी. माने यांनी गटामार्फत निविष्ठा उचलल्याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार ताकारी येथील सिद्धनाथ शेतकरी गटाला मागणीप्रमाणे लोखंडे कृषी सेवा केंद्रातून खते वितरित करण्यात आली. यावेळी कृषी अधीक्षक मास्तोळी यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत खते वितरीत करण्यात आली.
कृषी अधीक्षक मास्तोळी यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन व मार्गदर्शन केले. तसेच हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळा व एरंडी आंबवण सापळा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच एरंडी आंबवण सापळा किटचे मोफत वाटप ही त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना करण्यात आले.
खते, बी-बियाणे, किटकनाशके यांची उपलब्धता व आवश्यकता याबाबत चर्चाही करण्यात आली. यावेळी मंडल कृषी अधिकारी एस. टी. खारगे, कृषी सहाय्यक अमोल जंगम, श्रीकांत मंडले, सौ. मंदाकिनी थोरात, ताकारी सरपंच, कृषी मित्र, शेतकरी गट प्रतिनिधी उपस्थित होते.