मुंबई – विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जी भूमिका घेतली आहे त्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. या परीक्षांना अनुमती देऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य ठरणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.
आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात त्यांनी ही टीका केली आहे. शिवसेनेने म्हटले आहे की, संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गोवा आणि गुजरातमध्ये परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला आहे. तरीही राज्यपालांनी अशी सूचना करण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला आहे. भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर नाही म्हणून ते अशी सूचना करीत आहेत काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी कुलपती या नात्याने विद्यापीठांच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षांच्या प्रकरणावर निर्णय घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केली असून या प्रकरणात केली जाणारी दिरंगाई विद्यार्थ्यांच्या हिताची ठरणार नाही, असा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेणे हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचे उल्लंघन ठरेल, असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीला पत्र पाठवून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्याला राज्यपालांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. या अनावश्यक हस्तक्षेपाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना योग्य त्या सूचना कराव्यात, असेही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या अग्रलेखात सामंत यांच्या भूमिकेचे शिवसेनेने समर्थन केले आहे.