मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात सर्व विरोधी पक्षांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी असंतोष न दाखवता काही सूचना केल्या होत्या. राज्य सरकारने त्या सूचना अंमलातदेखील आणल्या. मग आताच हा स्टंट का?, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित केला.
“पार्टी विथ डिफरन्स’ असे बोलणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आपल्या कार्यकर्त्यांना 22 मे या तारखेला आंदोलन करण्यास सांगितले आहे. हा निव्वळ एक स्टंट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्याची जनता, सरकार आणि प्रशासन सध्या करोनाविरोधात लढत आहेत. करोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ते झटत आहेत. कार्यकर्त्यांनी या परिस्थितीत आंदोलन करण्यापेक्षा जनतेशी संवाद साधून दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. जनतेच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला सुभाष देसाई यांनी दिला. पण तसं न करता भाजप केवळ प्रसिद्धिसाठी आंदोलन करत असेल तर त्यांची दिशाभूल झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या परिस्थितीत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधी करोनाविरोधात एकत्र लढू, नंतर राजकारण करु, असे सांगितले पाहिजे. राजकारणाचीदेखील एक वेळ असते. ही वेळ राजकारणाची नाही. विधानसभेच्या निवडणुकीला साडेचार वर्ष बाकी आहेत. फडणवीस आपली जबाबदारी नेहमी योग्यप्रकारे पार पाडतात. त्यामुळे ते सध्याच्या परिस्थितीतही आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडतील. चुकीच्या गोष्टींमध्ये कार्यकर्त्यांचा वेळ आणि शक्ती वाया न घालवता ते खांद्याला खांदा लावून पक्षभेद न करता लढतील, असा मला विश्वास आहे, असे सुभाष देसाई म्हणाले.
तसेच सुरतमध्ये मजुरांचा असंतोषाचा भडका उडाला आहे. भाजपला दोषच शोधायचे असतील तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना तो भडका शमवण्याचा सल्ला द्यावा, असा टोलाहीदेसाई यांनी लगाविला आहे.