कोपरगाव -करोना महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटात सर्व राज्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करून हे संकट दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. काही राज्यांनी जनतेसाठी पॅकेज जाहीर केले. त्याप्रमाणेच महाविकास आघाडी सरकारने देखील पॅकेज जाहीर करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका भाजपतर्फे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले.
भाजपचे प्रांतिक सदस्य विधिज्ञ रवींद्र बोरावके यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी गटनेते रवींद्र पाठक, शहराध्यक्ष कैलास खैरे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे आदी उपस्थित होते. कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात करोन रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे नगरपालिका व कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी सहा महिन्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी.
तसेच शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिकांनी राष्ट्रीयीकृत बॅंका, पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जावरील सहा महिन्यांचे व्याज माफ करावे. स्थानिक बाजारपेठा सम-विषम तारखेनुसार सुरू कराव्यात. 2014 ते 2019 या काळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मंजूर रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत. करोना विरोधात लढण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली, ती आमलात आणण्यात राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. करोना महामारी दूर करण्यासाठी प्रत्येक जण संघर्ष करतो आहे. मात्र राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव आहे, याचा भाजपच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करत आहोत.