बेल्हे, दि. 16 (वार्ताहर) -जुन्नर तालुक्यातून मुंबई येथे वाशी मार्केटला तसेच इतर ठिकाणी अनेक वाहने आरटीओचे पास नसताना देखील ये- जा करीत आहेत. त्या वाहनांची उभारलेल्या चेक नाक्यावर साधी चौकशी कोणी करीत नाही. हे चेक नाके नावालाच उभारली आहेत काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
जुन्नर तालुक्यातून दररोज मुंबई, पुणे, अहमदनगर याठिकाणी अनेक वाहने ये- जा करतात. या वाहनांवर फक्त अत्यावश्यक सेवा, तरकारी, माल वाहतुकीसाठी असे कॉम्प्युटवर प्रिंट काढून चिटकवलेले दिसत आहे. काही वाहनांवर आरटीओचे पास चिटकवलेले दिसत आहेत. पासची सत्यता पडताळणी केली जात नसल्यामुळे सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
त्यामुळे ग्रामीण भागात करोनाचा फैलाव व्हायला वेळ लागणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या गाड्या जुन्नर तालुक्यातून इतर ठिकाणी जातात, त्यांचे कोठेही सॅनिटायझरींग केले जात नाही. त्यांना14 दिवस होम क्वारंटाइन केले जात नाही. या गाड्यांमधून अनेकजण चोरुन गावाकडे येत आहेत. या ठिकाणी असलेल्या चेक नाक्यावर कोणतेही वाहन, आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात नाही. पोलिसही आरटीओचे अधिकृत पास नसलेली वाहने कशी जाऊ देतात, याबद्दल नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.