पाबळ -कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना दोन घास घरचे गरम अन्न पुरवण्यात भूमिका बजावलेल्या पाबळ येथील बलुतेदार क्रांती प्रतिष्ठान व आपत्कालीन मदत पथकाने राजगुरूनगर येथील परप्रांतीयांना दररोज दोन घास घरचे अन्न पुरवण्याचे काम चार दिवसांपासून सुरू केले आहे. यातून दररोज किमान सहाशे मजुरांना ताजे अन्न दिले जात आहे.
राज्य प्रशासनाकडून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात सुलभपणे पाठवण्यासाठी राजगुरूनगर येथील शसकीय विश्रामगृहात नियोजनाची व्यवस्था केली आहे. याठिकाणी शासनाच्या सर्व खात्याचे अधिकारी, आरोग्य अधिकारी नियुक्त आहेत. याठिकाणी चाकण, खेड तसेच आळेफाटा परिसरातून मजुरांना एकत्र आणण्यात येत आहे. त्यांची निवास, आरोग्य तपासणी, जेवणाची सोय केली आहे. योग्य कागदपत्रांची पाहणी करून राजगुरूनगर आगारराच्या बसेसमधून त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. बलुतेदार प्रतिष्ठानच्या वतीने सर्व कामगारांना ताजे व गरम जेवण एक थिगलस्थल सोसायटीत शिजवले जात आहे.
पाच मिनिटात विश्रामगृहात गरम जेवण दिले जात आहे. यासाठी सोसायटीतील सर्व महिला धान्य निवडण्यापासून मदत करीत आहेत. संजय शेम्बडे, शिक्षक अजय थिगळे, सोमनाथ सुतार, सुनील पिंगळे, सनी लोहार, जनार्दन वारघडे यांच्यासह राजगुरूनगर येथील थिगलस्थल सोसायटीतील महिला मदत करीत आहेत. तीन दिवसांत दोन हजारावर कामगारांना जेवण दिल्याची माहिती अजय थिगळे यांनी दिली.