नवी दिल्ली – जम्मू विभागातून निमलष्करी दलांच्या 10 तुकड्या हटवण्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी दिला. त्याशिवाय, महाराष्ट्रात निमलष्करी दलांच्या 9 तुकड्या पाठवण्याचाही निर्णय घेतला.
जम्मू विभागातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) आणि भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) प्रत्येकी 3 तुकड्या हटवल्या जाणार आहेत. त्याशिवाय, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) आणि सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) प्रत्येकी 2 तुकड्या परत बोलावण्यात आल्या आहेत. त्या 10 तुकड्यांमध्ये 1 हजारहून अधिक जवान आहेत.
काश्मीर विभागात निमलष्करी दलांच्या तुकड्या कायम ठेवल्या जाणार आहेत. जम्मू विभागातील हटवण्यात आलेल्या 5 तुकड्या महाराष्ट्रात तैनात केल्या जातील. त्यातील 2 तुकड्या सीआरपीएफच्या तर 3 तुकड्या सीआयएसएफच्या असतील. त्याशिवाय, मुंबईस्थित शीघ्र कृती दलाच्या (आरएएफ) 4 तुकड्या महाराष्ट्रासाठी वापरल्या जाणार आहेत.
आरएएफ हे सीआरपीएफचे विशेष दंगलविरोधी पथक आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी निमलष्करी दलांच्या 20 तुकड्या पाठवाव्यात, अशी मागणी नुकतीच महाराष्ट्र सरकारकडून केंद्राला करण्यात आली होती.
महाराष्ट्रात आधीपासूनच सीआरपीएफच्या 32 तुकड्या तैनात आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी त्या तुकड्या महाराष्ट्र पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळत आहेत. निमलष्करी दलाच्या प्रत्येक तुकडीत सुमारे 100 जवान असतात.