मुंबई – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशपातळीवरील हा एक अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. गेल्या वेळी अव्वल क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजाचे नाव मंडळाने पुढे केले होते. तेव्हा देखील बुमराहचे नाव मागे पडले होते. प्रत्येक क्रीडा संघटना व संस्थेला दोन नावांची शिफारस करता येते. गेल्यावेळी जडेजासह सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती. मात्र, अंतिम यादी प्रसिद्ध झाली त्यात धवनचे नाव नव्हते. त्यामुळे यंदा मंडळाने बुमराहसह पुन्हा एकदा धवनचेही नाव पुढे केले आहे.
गेल्या वर्षी या दोघांसह वेगवान गोलंदाज महंमद शमी याच्याही नावाची शिफारस केली गेली होती. त्याच्याही नावावर त्यावेळी धवनप्रमाणेच फुली मारण्यात आली होती. बुमराहच्या कामगिरीबाबत बोलायचे तर गेल्या काही वर्षांत केवळ भारताचाच नव्हे तर जागतिक क्रिकेटचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज म्हणून तो नावारुपाला आला आहे. त्याने 14 कसोटीत 68, 64 एकदिवसीय सामन्यात 104 तर, 50 टी-20 सामन्यातून 59 बळी घेतले आहेत.
शिखा व दीप्तीची शिफारस….
बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडू शिखा पांडे व दीप्ती शर्मा यांच्या नावाचीही शिफारस केली आहे. यंदा झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरीही ही कामगिरी कौतुकास्पद होती कारण संघाने प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यात सरस कामगिरी करणारी शिखा व दीप्ती यांच्यापैकी पुरस्कार कोणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.