मिश्राची विराट कोहलीवर बोचरी टीका
नवी दिल्ली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर लेगस्पीन गोलंदाज अमित मिश्रा याने बोचरी टीका केली आहे. कोहली पोकळ आश्वासने देणारा व आपल्याच लाडक्या खेळाडूंनाच कवटाळून बसणारा खेळाडू आहे. तोंडावर साखरपेरणी करतो पण तशाच फसव्या वृत्तीने घातही करतो, असे ताशेरेही मिश्राने ओढले आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये आजवर जितके कर्णधार झाले ते आपल्या आवडत्या व लाडक्या खेळाडूंनाच संधी देताना पाहिले गेले.
अर्थात प्रत्येक कर्णधाराचा एक गट असतो. त्याला ज्यांच्यावर जास्त विश्वास वाटतो त्यालाच संधी मिळते मग त्यांची कामगिरी कितीही सुमार असली तरी. तो फक्त आश्वासने देतो ती कधीच पाळत नाही. तो काय आणि मुख्य प्रशिक्षकांसह संघ व्यवस्थापन काय ठरावीक खेळाडूंचाच आग्रह धरतात व काही खेळाडूंवर अन्याय करतात.
संघात जितके खेळाडू प्राथमिक स्तरावर निवडले जातात त्यात आपल्या गुडबुकमध्ये असलेल्या खेळाडूंनाच संधी मिळते हे मी स्वानुभवाने सांगतो. खेळाडूचे त्याच्याशी कसे संबंध आहेत हे पाहिले जाते त्याची गुणवत्ता किंवा कामगिरी पाहिली जात नाही. सर्व खेळाडूंना समान न्याय लावला जात नाही. जे खास आहेत त्यांचीच तळी उचलली जाते. जेव्हा कोहलीच्या खास खेळाडूला खेळवायचे असायचे तेव्हा अनेकदा माझ्यावरच गदा आलेली आहे. सगळ्यांना समान न्याय न मिळता व्यक्तीसापेक्ष निर्णय होत होते. याबाबत कोहलीशी संवाद साधला की तो काळजी करु नकोस निश्चिंत राहा असे सांगायचा पण संघ घोषित झाला की त्याचे आश्वासन किती पोकळ असते ते समजायचे, असेही मिश्राने सांगितले.
माझ्याशी त्याने एकदा चर्चा करताना सांगितले होते की निवड समितीशी बोलतो तू ताण घेऊ नको. पण तसे काहीच घडले नाही. संघ जाहीर करण्यात आला तेव्हा त्यात माझे नाव नव्हते मात्र, त्याच्याच पसंतीच्या एका खेळाडूचे नाव होते. या खेळाडूने देशांतर्गत स्पर्धेत देखील निराशाजनक कामगिरी केली होती. त्यावेळी मी आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधीक तीनवेळा हॅटट्रिक घेणारा गोलंदाज म्हणून माझे नाव नोंदले गेले होते तरीही माझ्याकडे दुर्लक्ष झाले.
मी सौरव गांगुली व महेंद्रसिंग धोनी यांच्याही नेतृत्वाखाली खेळलो आहे. त्यांच्यासारखा पाठिंबा कोहलीने दिला असता तर माझ्या नावावर जवळपास 100 कसोटी सामन्यांची नोंद झाली असती. त्याच्या पसंतीचे खेळाडू संघात असूनही भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, तरीही करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर जेव्हा सामन्यांचे वेळापत्रक व संघ जाहीर होईल तेव्हा तेच खेळाडू संघात निवडले जातील, असेही मिश्राने व्यक्त केले.