नवी दिल्ली : अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्र्य आयोगाने २०१९ मध्ये भारतातील धार्मिक स्वातंत्र्यात घसरण झाल्याचा दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्र्य आयोगाने यासंदर्भात एक ट्विट करून हा दावा केला आहे. तसेच देशात करोनाच्या संकटकाळातही ही स्थिती कायम राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
२०१९ या वर्षी भारतातील धार्मिक स्वातंत्र्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. तसंच यावेळी करोनाच्या संकटकाळात ही स्थिती कायम राहिली आणि संकटकाळात मुस्लिमांचा बळी देण्यात आला, असा आरोपही अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्र्य आयोगाने (USCIRF) केला आहे. १३ मे रोजी अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्र्य आयोगाने यासंदर्भातील ट्विट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी भारताला चिंताग्रस्त देशांच्या यादीत टाकण्याचीही सुचवलं आहे.
यापूर्वी धार्मिक स्वातंत्र्यासंबंधीचा अमेरिकन समितीचा अहवाल भारताने एप्रिल महिन्यात फेटाळून लावला होता. भारतात अल्पसंख्यांकांना पक्षपातीपणाची वागणूक दिली जात असून त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याचे अमेरिकन समितीच्या अहवालात म्हटले होते. भारतात पद्धतशीरपणे अत्यंत भयंकर असे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याने भारताचा ‘विशेष चिंता’ असलेल्या देशांमध्ये समावेश करावा ,अशी शिफारस अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोगाने (USCIRF) आपल्या २०२० च्या अहवालात केली होती. USCIRF ने त्यांच्या अहवालात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा हवालादेखील दिला होता.