शिक्रापूर (प्रतिनिधी) –चासकमान कालव्याचे पाणी मिळविण्यासाठी करंदी येथे काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे; मात्र ते चुकीचे असल्याचे मत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले आहे.
करंदी (ता. शिरूर) येथे काही शेतकऱ्यांनी चासकमानचे पाणी मिळविण्यासाठी आंदोलन केले असताना चासकमान विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दहा मे रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले असताना अचानक पाणी सोडले जाणार नसल्याचे कळविले. त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी चासकमान कालव्यावर जात पाण्याचा ताबा घेत त्या ठिकाणी उद्रेक केला.
अखेर पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्यांनी घेतलेले पाणी बंद करावे लागले. काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी 21 मे रोजी पाणी सोडणार असल्याचे सांगितले. यानंतर चासकमान कालव्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पाश्वभूमीवर आज शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी या ठिकाणची पाहणी केली. यावेळी चासकमान विभागाचे कार्यकारी अभियंता शेटे, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे आदी उपस्थित होते.
शिक्रापूर येथे पत्रकारांशी बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले, सध्या करोना विरोधात सर्वजण लढत असताना शेतकऱ्यांनी वाद करणे चुकीचे आहे. चासकमानच्या पाण्याचे रब्बीचा हंगामातील पंधरा दिवसाचे पाणी आपण वाचविले असून ते उन्हाळ्यासाठी शिल्लक ठेवले आहे. हे पाणी पन्नास दिवसांपासून आपल्या तालुक्याला सोडलेले असून पूर्वेकडील भागात काही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. न्हावरा, निर्वी, निमोणे या भागामध्ये शेतकऱ्यांची पिके जळून चाललेली आहेत, त्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे. सध्या धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असून पाणी योग्य पद्धतीने पुरविले जाणार आहे. सध्या या कालव्यावर अनेक ठिकाणी तीनशेहून अधिक ठिकाणी विद्युत पंप सुरु असल्याचे दिसून आले. त्यामुळे या शेतकऱ्यांना हे विद्युत पंप बंद करण्याची विनंती केली असल्याचे देखील आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
कालव्याची गळती थांबविणे गरजेचे
चासकमान कालव्याला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पाणी वाया जात आहे. पुढील काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून गळती थांबविण्यासाठी काम केले जाणार असल्याचे देखील आमदार अशोक पवार यांनी सांगितले.