कराड (प्रतिनिधी) – करोना संसर्गजन्य साथीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम शाळा स्तरावर सुरू झाला. पण, 1 मे नंतर शैक्षणिक वर्ष संपून उन्हाळी सुट्टी लागते. तरीही विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणाचा मारा सुरू आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष नेमके केव्हा संपणार? व नवे शैक्षणिक वर्ष केंव्हा सुरु होणार? याची प्रतीक्षा विद्यार्थी व पालकांना लागून राहिली आहे
करोना संसर्गजन्य साथीमुळे 15 मार्च 2020 नंतर शाळा-महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली. यानंतर पाचवी ते अकरावीपर्यंत परीक्षाही रद्द केल्या. पण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील उर्वरित शैक्षणिक वर्षाचा अभ्यास पूर्ण व्हावा यासाठी माध्यमिक शाळा व शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण ही नवी योजना सुरू केली. यामध्ये शाळा स्तरावर प्रत्येक विषय शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या पालकाच्या अँडराईड मोबाईलवर शाळेचा अभ्यास देण्यास सुरुवात केली. हा अभ्यास घेताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन सूचनाही देण्यात येत आहेत.
ज्या विद्यार्थ्यांकडे अँडरॉईड मोबाईल नसतील अशा विद्यार्थ्याने आपल्या शेजारी असलेल्या मित्रांकडून अभ्यास जाणून घ्यावा, अशाही सूचना करण्यात आल्या होत्या. गेली दीड महिना अशा पद्धतीने शैक्षणिक सत्र सुरू आहे.
सन 2020-21 हे शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्याच्या 30 तारखेला संपते. व महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल दिला की दीड महिना विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली जाते. 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षास सुरूवात होते. असे आजपर्यत सातत्याने सुरू आहे. यामध्ये काहीही बदल झालेला नाही. पण यावर्षी संसर्गजन्य साथीमुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून संसर्ग वाढल्याने संपूर्ण राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या. इतकेच काय पण पहिली ते नववीपर्यंत व नंतर अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. वर्षभराच्या सरासरी गुणावर विद्यार्थ्यांना निकाल देण्याचे शासनाने जाहीर केले.
पण वर्ष संपलेतरी विद्यार्थ्यांना सर्वच शाळांकडून ऑनलाईन शिक्षणाचा मारा सुरू आहे. हा मारा केव्हा थांबणार ? असा प्रश्न विद्यार्थी व पालक वर्गातून उपस्थित होत आहे. याबाबत शिक्षकांशी संपर्क साधला असता प्रशासनाने सांगितल्याशिवाय आम्ही ते बंद करू शकत नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष नक्की कधी व कसे सुरू होणार असा प्रश्न आता पालकांमधून उपस्थित होत आहे.