नवी दिल्ली – भारतीय संघात पदार्पण केले तेव्हा श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झालो. कारकीर्दीच्या सुरुवातीला जरी अपयश आले तरीही त्यातून खूप काही शिकलो, बोध घेतला अशा शब्दात अष्टपैलु क्रिकेटपटू सुरेश रैना याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
वयाच्या 18 व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. त्यावेळी राहुल द्रविड कर्णधार होता. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने चक्क सलामीवीर म्हणून डावाची सुरुवात केली होती. श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याच्या गोलंदाजीवर मी पहिल्याच चेंडूवर पायचीत झालो. त्यावेळी मी खूप निराश झालो होतो. सामना संपल्यावर हॉटेलवर परतलो तरीही मला त्यानंतर पुढील दोन-तीन दिवस शांत झोपही लागली नाही. माझे अपयश व संघातील स्थान टीकेल का या चिंतेने मी व्यथित झालो होतो, असे रैनाने सांगितले.
या मालिकेत भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. पहिल्याच सामन्यातील अपयश मला सलत होते. मात्र, कर्णधार द्रविडने मला प्रोत्साहन दिले व कोणतेही दडपण न घेता खेळ कर असा सल्लाही दिला. द्रविड व धोनी यांनी मला संघातील स्थानाबाबत भीती बाळगु नकोस. तुझा नैसर्गिक खेळ कर निश्चितच यश मिळेल असा विश्वास दिला, त्यामुळेच मी निराशाजनक मानसिकतेतून बाहेर आलो व माझा आत्मविश्वास वाढला, असेही रैना म्हणाला.