पिंपरी (प्रतिनिधी) – कोरोनाच्या संकटामुळे पीएमपीच्या ताफ्यातील भाडे तत्त्वावरील ठेकेदारांच्या बस बंद ठेवण्यात आले आहेत. बस धावत नसल्या तरीही ठरलेली रक्कम संबंधित ठेकेदारांना देणे बंधनकारक आहे. त्यामुळे भाडे तत्त्वावरील बस बंद असूनही ठेकेदारांना कोट्यवधी रुपये मोजावेच लागणार आहेत. अशा स्थितीत पिंपरी-चिंचवडमधून आपल्या मूळगावी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी भाडे तत्त्वावरील बस उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे ई मेलद्वारे केली आहे.
आमदार जगताप यांनीपत्रात म्हटले आहे, पीएमपीकडे आजमितीला दोन हजारांहून अधिक बस आहेत. करोनाच्या संकटामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून घेतलेल्या बस बंद अवस्थेत आहेत. या बस मूळ गावी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात.