मुंबई – स्थलांतरित कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेण्याच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. परदेशातील भारतीयांना विमानातून फुकट आणले, मग स्थलांतरित कामगारांकडून पैसे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी गावी जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांकडून रेल्वे किंवा बसच्या तिकिटाचे पैसे आकारु नये, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही स्थलांतरित कामगारांबाबत भेदभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकार असो की राज्य सरकार दोघांनीही स्थलांतरित कामगारांशी भेदभाव करायचे असे ठरवले आहे. विदेशात अडकलेल्या भारतीयांना विमानातून घेऊन आले. त्यांना घेऊन येताना त्यांना कुठल्याही प्रकारचं तिकिट आकारले नाही किंवा भाडे भरायला लावले नाही. मात्र, आता स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी नेताना रेल्वे किंवा बससाठी तिकिट आकारली जात आहेत. हा सरकारकडून सुरु असलेला भेदभाव आहे, असे मला वाटते.
हा निर्णय सरकारने तातडीने बदलला पाहिजे. जसं विमानातून घेऊन येणाऱ्यांकडून कोणतेही भाडे घेतले नाही, त्यांना मोफत घेऊन आला. त्याचप्रमाणे गावी जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांकडून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.