नवी दिल्ली – पाकिस्तानचा दृष्टीकोन अजूनही संकुचित आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसवण्याचा मर्यादित अजेंडाच पाकिस्तान अजूनही राबवत आहे, असा आरोप लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केला आहे. जर युद्धबंदीचे उल्लंघन आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे धोरण पाकिस्तानने सोडले नाही, तर अशा सर्व कृतींना भारत योग्य प्रमाणात प्रत्युत्तर देईल. शांतता राखण्याची जबाबदारी पाकिस्तानवर राहिल. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे धोरण सोडत नाही, तोपर्यंत भारतीय लष्कर या आगळीकीला योग्य प्रमाणात प्रत्युत्तर देतच राहिल, असेही लष्कर प्रमुखांनी सांगितले.
हंदवारा इथे नागरिकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्याच्या कामगिरीदरम्यान वीरमरण आलेल्या पाचही शूर अधिकारी आणि जवानांचा देशाला अभिमान आहे, असे लष्कर प्रमुख म्हणाले. या कारवाईचे नेतृत्व करनाऱ्या कर्नल आशुतोष शर्मा यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
जम्मू काश्मीरमध्ये ताबारेषेवरून अलिकडच्या काळात झालेल्या घुसखोरीमुळे पाकिस्तानला करोनाच्या साथीला नियंत्रणात आणण्यात काहीही स्वारस्य नाही, हेच लक्षात येते आहे. दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा आपला संकुचित अजेंडाच अजूनही राबवला जातो आहे. करोनाच्या वाढणाऱ्या रुग्णांची संख्या आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा यावरून पाक सरकार आणि लष्कराकडून पाकिस्तानच्या नागरिकांना दुय्यम महत्व दिले जात असल्याचेच स्पष्ट होत आहे, असेही जन. नरवणे म्हणाले.
“सार्क’च्या व्हिडीओ कॉन्फरन्सदरम्यान करोनाच्या साथीवरील उपाय योजनांऐवजी जम्मू काश्मीरमधील मानवी हक्कांच्या पायमल्लीचा गैरलागू मुद्दा उपस्थित केल्याने पाकिस्तानचा संकुचितपणाच दिसून आला होता. “एलओसी’वरील शस्त्रसंधीच्या उल्लंघनातून निरपराध नागरिकांना लक्ष्य केल्याने पाकिस्तान जागतिक धोका असल्याचेच सिद्ध झाले. दहशतवाद्यांच्या “वॉच लिस्ट’मधील नावे पाकिस्तानने वगळल्यानेही पाकचा दहशतवादाचा विदेश धोरण म्हणून वापर करण्यावर विश्वास असल्याचेच सिद्ध होते आहे, असेही लष्कर प्रमुख म्हणाले.
अमली पदार्थांची तस्करी आणि मनी लॉन्डरिंग नेटवर्कमुळेच अफगाण सुरक्षा दलांवरील हल्ल्यांमध्ये अचानक वाढीला पाठबळ मिळत असल्याचे दर्शविते, असेही ते म्हणाले.