मुंबई – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा असताना राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, तीन दिवसांतच अजित पवारांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. या घडामोडीनंतरही अजित पवारांना झुकते माप का, असा प्रश्न अनेक जणांच्या मनात होता. या प्रश्नाचे उत्तर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले आहे.
एका वृत्तपत्राला मुलाखत देताना शरद पवारांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाविषयी प्रश्न विचारले असता ते म्हणाले कि, अजित पवारांना महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन २०-२५ वर्षे झालीआहेत. सुरूवातीच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनच काम केलं. पाठिशी विधानसभेतील बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा असतानाही असा काही विचार कधी त्यांनी केला नाही. उपमुख्यमंत्रीपदाची संधी असताना त्यांनी छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील किंवा आर. आर. पाटील यांची नावं सुचवली. स्वतःला संधी असताना त्यांनी स्वतःचा विचार कधी केला नाही. फक्त एक चुकीचं पाऊल रागाच्या परिस्थिती त्यांनी टाकलं. आणि आताच्या गव्हर्नर साहेबांनी पहाटे उठून शपथ देण्याची तत्परता दाखवली. तितकं एक काम, पण तेही त्यांच्या लक्षात आल्यानंतर ४८ तासांत त्यांनी राजीनामा देऊन चूक सुधारली. त्यानंतर पक्षातील सदस्यांनी एकजीवानं काम करण्याचा आग्रह केला. त्यातून त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
अजित पवारांचं वैशिष्ट्ये म्हणजे कष्ट भयंकर करतात. सकाळी सात वाजता त्यांचं कार्यालय सुरू होतं. जास्तीत जास्त लोकांना भेटणं, प्रश्न सोडवणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. काही गोष्टी होतात. पण, जसजसा वय वाढतं, अनुभव वाढतं. तशा या गोष्टी कमी होत जातात, असे शरद पवार यांनी सांगितले.