शिरूर (प्रतिनिधी) –रांजणगाव (ता. शिरूर) येथील पंचतारांकित एमआयडीसी कंपनी कंत्राटी कामगारांची वेतनाअभावी मोठी परवड होत असून या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे पगार दिले आहेत; मात्र ठेकेदार करोनाच्या नावाखाली कामगारांची अडवणूक करून वेतन देण्यात टाळाटाळ करीत आहेत. अशा ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांनी आता वेतनासाठी थेट कंपनीच्या प्रवेशद्वारावर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवत गर्दी करण्यास सुरुवात केली असून करोनाच्या पार्श्वभूमीवरही गंभीर बाब म्हणावी लागेल.
रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत जवळपास 400 पेक्षा अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या असून या कंपन्यांमध्ये सुमारे 50 हजारांपेक्षा अधिक कंत्राटी कामगार काम करीत आहे.सध्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे 20 मार्चपासून एमआयडीसीतील अत्यावश्यक सेवेतील कंपन्या वगळता अन्य कंपन्या महिनाभरापासून बंद आहेत. काही कंपन्यांनी मागील महिन्यात केलेल्या कामाचा पगार एप्रिल महिना संपत आला तरी अद्यापही बहुतांश कामगारांना दिला नसल्याने या कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तर ज्या कंपन्यांनी ठेकेदारांना पगार दिले आहेत, ते ठेकेदार लॉकडाऊनमध्ये अडकलो आहे, या कारणावरून कामगारांना पगार देत नसल्याने या कामगारांवर पगारासाठी कंपन्याचे प्रवेशद्वार ठोठावण्याची वेळ आली असून खायचे काय असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. तर वेतनासाठी फोन येत असल्याने काही ठेकेदार व सुपरवायझर कामगारांचे फोन उचलत नसल्याने त्या कामगारांनी नेमके काय करायचे असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
पोलिसांनी फोन करताच वेतन आदा
रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या काही कामगारांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक निरीक्षक प्रफुल्ल कदम यांच्या पुढे आपले गाऱ्हाणी मांडल्यानंतर त्यांनी संबंधित ठेकेदारांना कामगारांना पगार देण्याच्या सूचना केल्यानंतर बहुतांश कामगारांचा मार्च महिन्याचा पगार मिळाल्याने काही कामगारांना दिलासा मिळाला आहे. जर पोलिसांनी फोन करूनच जर वेतन मिळत असेल तर कंपन्यांनी ठेकेदारांना हटवून थेट कर्मचाऱ्यांना पगार द्यावा, अशी मागणी जोर धरीत आहेत.