मुंबई : करोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे, हा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल तर नागरिकांनी तो गांभीर्यानं घेऊन सावध व्हावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तसेच यापुढचे काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी नियमांचं पालन करावं, नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये, घराबाहेर पडू नये, गर्दीत जावून स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
अजित पवार म्हणाले, गेले काही दिवस मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मालेगावसारख्या शहरात करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानं चिंता वाढली आहे. मुंबईत 20 एप्रिलला एका दिवसात 450 हून अधिक रुग्ण वाढले. राज्यातील रुग्णांची संख्या साडेचार हजारांपेक्षा अधिक झाली आहे. 24 मार्चच्या आधीपासून टाळेबंदी जाहीर करुनही झालेली वाढ गंभीर आहे. मुंबईतील 53 पत्रकार बांधवांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.
यातून कोरोनानं हातपाय कुठपर्यंत पसरले आहेत हे लक्षात येतं. तरीही शहरात रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. यातून ते स्वत:च्या, कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. हे थांबलं पाहिजे, घरातली व्यक्ती घराबाहेर जाणार नाही ही जबाबदारी आता कुटुंबातील महिलांनी, मुलांनी घेतली पाहिजे. घराबाहेर जाण्यापासून सर्वांना रोखलं पाहिजे.
देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आपले डॉक्टर, आपले पोलीस, या सर्वांनी आपल्याला घराबाहेर न पडण्याचं, घरातंच थांबण्याचं, गर्दी न करण्याचं, सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनानुसार आम्ही देखील शारीरिक अंतराचं भान राखून, सुरक्षितता बाळगून कर्तव्ये पार पाडत आहोत. किमान अधिकारी व सहकाऱ्यांना सोबत घेऊन, बैठका घेऊन विषय मार्गी लावत आहोत. केंद्र व राज्य सरकारं, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील प्रत्येक जण जोखीम पत्करुन आज कर्तव्य पार पाडत आहेत. नागरिकांनी घरातंच थांबून साथ द्यावी, ही त्यांची अपेक्षा आहे.
नागरिकांनी दाखवलेला संयम, सहकार्यामुळेच राज्यातील काही जिल्हे आजही कोरोनामुक्त आहेत. नांदेड, सांगलीसारखे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यापासून बोध घेऊन आपला जिल्हाही कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया. आपण सर्वांनी पुढचे काही दिवस घरातच थांबण्याचा निर्धार केल्यास करोनाच्या लढाईत विजय नक्की आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई, ठाणे, पुण्यात, मालेगाव सारख्या शहरात पुढचे काही दिवस टाळेबंदी नियमांचं मनापासून, स्वयंशिस्तीनं काटेकोर पालन करावं, असंही आवाहन त्यांनी केलं.