झाडे पडून चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान
बेदाण्याचे शेड वादळाच्या कचाट्यात सापडले
सोलापूर : सोलापूरकर अनेक दिवसांपासून उखड्याने हैराण झाले असतानाच शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने सोलापूरकर थोडेफार सुखावले असतानाच शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.सकाळी गारवा,दुपारपासून कडक ऊन आणि सायंकाळी पाऊस असा अनुभव सोलापूरकरांना येत आहे.शनिवारी दुपारी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी,कारंबा, गुळवंची,भोगाव आदी ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.
सेवालाल नगर,नारोटेवाडी परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने घरांचे नुकसान झाले.काही ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या.काही ठिकाणी वाहनांवर झाडे पडून मोठे नुकसान झाले.उत्तर सोलापूर तालुक्यात एका शेतकऱ्याच्या बेदाण्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले.