उत्पादन घटले त्यात लॉकडाऊनमुळे बाजापेठाही बंद
पुणे – राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांनी हळदीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. दरवर्षी या पिकाचे लागवड क्षेत्र वाढत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेवटपर्यंत पाणीही उपलब्ध होते. मात्र, आता काढणी केल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना कमी प्रमाणात उत्पादन मिळत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय लॉकडाऊनमुळे वाहतूक देखील ठप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मसाल्याच्या पदार्थात हळदीला महत्त्वाचे स्थान आहे. सौंदर्यप्रसादने असो किंवा औषध हळदीला फार महत्त्व आहे. पूजाविधीसाठीही हळदीला मान आहे. परंतु, बहुसंख्य ठिकाणी मान मिळवणाऱ्याला हळदी उत्पादकांना मात्र आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र 1,25,800 हेक्टर असून उत्पादन 5,50,185 मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ 80 टक्के उत्पादन भारतामध्ये होते, महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली 8,500 हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 42,500 मेट्रिक टन इतके होते.
महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे. परंतु, यंदा हळद उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सरासरी उत्पादन 40 ते 50 टक्क्यांपर्यंत घटले असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून हळद काढणी सुरू झाली होती. आता हा हंगाम अंतिम टप्प्यात आहे.
एकरी सरासरी 100 क्किंटलपेक्षा अधिक ओली हळद होणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा 70 ते 80 क्किंटलदरम्यान उतारा मिळाला आहे. यंदा अतिपाऊस झाल्याने, हळदीवर कीडीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकतेला फटका बसला आहे. ओली हळद 100 क्किंटल होत असेल तर ती उकळून वाळविल्यानंतर 20 क्विंटल राहते. म्हणजेच पाचवा हिस्साच उत्पादन म्हणून गृहीत धरावा लागतो. आता, संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद आहेत. यामुळे हळद घरातच साठवून ठेवावी लागत असल्याचे वास्तव आहे.त्यामुळे उत्पादनातील घट आणि साठवणुकीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.