लाहोर – पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना अन्य कोणत्याही विकाराची चाचणी करण्यापेक्षा आपल्या बुद्धिची क्षमता चाचणी करुन घेण्याची सध्या गरज असल्याचेच त्यांच्या क्रिकेटपटूंच्या वक्तव्यांवरुन सिद्ध होत आहे. शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी यांच्या नंतर आता रमिज राजा यांनी विराट कोहलीपेक्षाही जास्त गुणवत्ता बाबर आझमकडे आहे, अशी मुक्ताफळे उधळली आहेत.
बाबरचा खेळ मी अनेकदा पाहिला आहे. त्याचे शॉट सिलेक्शन, खेळपट्टीवर टिकून राहण्याची वृत्ती, फलंदाजीचे निर्दोष तंत्र याबाबत तो कोहलीपेक्षाही सरस आहे. केवळ कोहलीची सकारात्मक मानसिकता त्याने अंगिकारली तर तो येत्या काळात कोहलीपेक्षाही बलाढ्य फलंदाज म्हणून नावारुपाला येईल, असे मत राजा यांनी व्यक्त केले.
जेव्हा बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हापासूनच मला त्याच्यात एक प्रकारचा स्पार्क जाणवला होता. त्याला महत्त्वाच्या सामन्यात संयमाने खेळ कसा करायचा याचे धडे कोहलीची फलंदाजी पाहून घ्यावे लागतील. कोणत्याही सामन्यात विशेषतः मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कोहली जसा आपला डाव उभा करतो ती हुकूमत बाबरदेखील गाजवू शकतो. मात्र, त्यासाठी त्याला आपल्या आक्रमकतेला तंत्राची जोड द्यावी लागेल. केवळ धोका पत्करुन चौकार किंवा षटकार मारण्यापेक्षा तंत्र भक्कम करण्यावर भर द्यावा लागेल, असेही राजा यांनी व्यक्त केले.
शोएब अख्तर याने नुकतेच करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारत व पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा मदतनिधी सामना व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याच्या हाताला हात लावून शाहिद आफ्रिदीनेही ममं म्हटले होते. त्याच सुरात राजा यांनीही सूर मिसळला आहे.
डागाळलेल्या खेळाडूंना स्थान नको…
पाकिस्तानच्या ज्या क्रिकेटपटूंनी फिक्सिंग किंवा सट्टेबाजी केली असल्याचे उघड झाले आहे त्यांना पुन्हा पाकिस्तान संघात स्थान देण्यात येऊ नये. महंमद आमीर याने स्पॉट फिक्सिंग केल्याने त्याला निलंबित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा त्याला संघात स्थान देण्यात आले. भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर पाकिस्तान क्रिकेटसाठी तो धोका ठरु शकतो, असाही इशारा राजा यांनी दिला आहे.