पुणे – ठप्प पडलेले उद्योग-व्यवसाय, तुरळक वाहतूक यामुळे विविध घटकांवर चांगला-वाईट परिणाम होत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, एकीकडे देशातील विजेच्या मागणीत 18.72 टक्के घट झाली आहे. त्याचवेळी विजेच्या वापरामुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जन घटले असून, त्यामुळे पर्टीक्युलेट मॅटर (पीएम) या सर्वात प्रदूषणकारी घटकाची निर्मिती 6.8 टक्क्यांनी कमी झाली आहे.
पर्टीक्युलेट मॅटर अर्थात अतिसुक्ष्मकण हा हवेतील सर्वात प्रदूषणकारी घटक आहे. पीएम 10 आणि पीएम 2.5 अशा दोन स्वरुपात तो आढळतो. प्रामुख्याने वाहनातील उत्सर्जन हा त्यामागील प्रमुख स्रोत असला, तरी विजेच्या वापरामुळे होणारे कार्बन उत्सर्जन हादेखील त्यामागील एक महत्त्वाचा स्रोत आहे.
सर्वसामान्य परिस्थितीत वाहनांची वर्दळ आणि औद्योगिक उत्सर्जन यामुळे अनेक शहरांच्या हवेत या प्रदूषणकारी घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते. मात्र, करोनामुळे जगातल्या अनेक देशांना याचा प्रसार रोकण्यासाठी काही कडक पावले उचलावी लागली आहेत. यामुळे दुकाने, मॉल, विमानतळे, रेल्वे स्थानके यांच्या जगमगाटीला विराम लागला असून रस्ते ओसाड व सुन्न पडले आहेत.
एवढेच नव्हे तर बरेच मोठे उद्योगांनासुद्धा तात्पुरती कुलपे लागली आहेत. ही अभूतपूर्व स्थिती असल्याने, या परिस्थितीत पर्यावरणावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या “एपिक’ या संस्थेतर्फे केला जात आहे. अमेरिका, भारत, चीन व युरोपीय देश अशा काही प्रमुख देशांमध्ये हा अभ्यास केला जात आहे. संस्थेतर्फे नुकताच हा अभ्यास प्रकाशित केला असून, या अभ्यासानुसार डिसेंबर 2019 ते एप्रिल 2020 या कालावधीत भारतातील विजेच्या मागणीत मोठी तफावत आली आहे. एप्रिल 2020 मध्ये देशातील विजेचा वापर डिसेंबर 2019 च्या तुलनेत 18.72 टक्के कमी झाला आहे. तर कार्बन उत्सर्जनात घट होऊन पीएम घटकाची निर्मिती 6.8 टक्क्यांनी कमी झाली आहे.
पुण्याची विजेची मागणी निम्म्याने घटली
पुणे शहराचा विचार करता, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागास उन्हाळ्याच्या दिवसांत अकराशे ते किमान तेराशे मेगावॉट वीज रोजच गरजेची असते. तर थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसात ही मागणी (प्रतिदिन) हजार मेगावॉट एवढी खाली आलेली असते. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे वीजेची मागणी निम्म्याने कमी होऊन ते अगदी 500 ते 600 मेगावॉट एवढी खाली आली आहे. इतकेच नव्हे, तर घरगुती वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांनी करोनामुळे वातानुकुलित यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे सुद्धा वीजेचा वापर कमी झाल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.