केरळच्या अर्थमंत्र्यांचा मोदींवर निशाणा
थिरूवनंतपूरम : करोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी राज्यांना अतिरिक्त आर्थिक पॅकेज जाहीर न केल्याबद्दल केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राज्यांना प्रशंसा नकोय; आर्थिक मदत हवीय, असे इसाक यांनी म्हटले.
मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणावेळी करोनावर मात करण्यासाठी प्रभावी लढा देत असल्याबद्दल राज्यांचा पाठ थोपटली. मात्र, त्या प्रशंसेने राज्यांचे समाधान झाले नसल्याचे इसाक यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले.
अर्थात, इसाक यांनी देशव्यापी लॉकडाऊनची मुदत वाढवण्याच्या घोषणेचे समर्थन केले. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याने करोना फैलावावर नियंत्रण आणता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी चाचण्यांचा वेग वाढवण्याची गरज आहे. अधिकाधिक चाचण्या झाल्याशिवाय लॉकडाऊन प्रभावी ठरणार नाही. त्याशिवाय, स्थलांतरित मजुरांना उत्पन्नाबाबत दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा, देशभरातील स्थलांतरित मजूर लॉकडाऊन झुगारून त्यांच्या गावांकडे धाव घेतील, असा इशाराही त्यांनी दिला. देशातील सर्वांत पहिले तीन करोनाबाधित केरळमध्ये आढळले होते. मात्र, करोनाचा फैलाव रोखण्यात त्या राज्याला बऱ्यापैकी यश आल्याचे सध्याचे चित्र आहे.