शालेय पोषण आहार योजना : अनेक शाळा जबाबदार असल्याचा अहवाल
पुणे – राज्यात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत ग्रामीण भागांतील 49 हजार 844 शाळांमधील 40 लाख 91 हजार 751 विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळ वाटप केले आहे. दरम्यान, 22 हजार 442 शाळांमधील 27 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळ वाटप करण्याची कार्यवाही अपूर्ण आहे. या धान्य वाटपाचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने नुकताच शासनाकडे दिला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या महिन्यापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत.
या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने पोषण आहार पुरवण्याबाबत निर्देश दिले होते. केंद्र शासनाकडून मार्गदर्शनही मागवले होते. शिक्षण विभागाने त्याची दखल घेत योजनेतील शिल्लक धान्यसाठा विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय 27 मार्चला घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना धान्य वाटपाचा निर्णय झाला. त्यासाठी एप्रिलपर्यंत मुदत होती. धान्य वाटपाचा अहवाल 7 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार अहवाल सादर केले आहेत. सर्व अहवाल एकत्रित करून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे.
राज्यातील ग्रामीण भागात 72 हजार 368 शाळा असून यातील एकूण विद्यार्थी संख्या 2 लाख 168 हजार एवढी आहे. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले आहे. प्रति विद्यार्थी सरासरी 4.20 किलोग्रॅम तांदूळ तर, 1.36 किलोग्रॅम डाळ वाटप करण्यात आले आहेत. राज्यात एकूण 17 हजार 210 मेट्रिक टन तांदूळ व 5 हजार 599 मेट्रिक टन डाळ वाटप करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
…म्हणून धान्य वाटप प्रलंबित
संचारबंदी, विद्यार्थी गावाला गेलेत, विद्यार्थी व पालक येत नाहीत, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वाटप करण्याचा शाळा व्यवस्थापन समितीचा निर्णय, टप्प्याटप्प्याने वाटप करू अशी कारणे पुढे करत शाळांनी धान्य वाटप प्रलंबित ठेवल्याचे उघड झाले आहे. या शाळांना धान्य वाटप व्हावे, यासाठी कडक समज देण्याची गरज आहे.
धान्यवाटप प्रलंबित असलेली जिल्हानिहाय शाळा संख्या
पुणे-832, नगर -1021, अकोला -4, अमरावती -40, औरंगाबाद-312, बीड -0, भंडारा- 0, बुलढाणा- 2, चंद्रपूर -831, धुळे- 5, गडचिरोली- 126, गोंदिया -383, हिंगोली- 836, जळगाव- 408, जालना- 35, कोल्हापूर- 1675, नागपूर- 735, लातूर- 1234, नांदेड- 1671, नंदूरबार- 192, नाशिक- 531, उस्मानाबाद-242, पालघर- 956, परभणी- 438, रायगड- 425, रत्नागिरी- 1044, सांगली- 35, सातारा- 1210, सोलापूर- 2740, सिंधुदुर्ग -1629, ठाणे- 1166, वर्धा- 1, वाशिम- 14, यवतमाळ-1690.