अकोले, (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नाचून नाही तर पुस्तक वाचून आपल्या घरातच साजरी करावी, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य सचिव विजय वाकचौरे व जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
14 एप्रिल रोजी महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. सर्वच राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, संस्था, कार्यकर्ते जयंती साजरी करतात. महामानवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. समाज स्वखर्चाने स्टेज, डेकोरेशन, शोभायात्रा, व्याख्यान, स्नेहभोजनाचे आयोजन करतो. मात्र यावर्षी करोनाचे जागतिक संकट उभे आहे. सरकार खबरदारी म्हणून योग्य पावलं उचलत आहे. आपण देखील सजग नागरिक या नात्याने, आपल्या आणि इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक जयंती साजरी करणे उचित होणार नाही. याच करोनाच्या अनुषंगाने देशभर संचारबंदी लागू आहे. कायद्याचे पालन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कायदा संविधानावर चालतो आणि संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे. म्हणूनच कायद्याचे पालन करावे, कोणत्याही प्रकारे सार्वजनिक जयंतीचे नियोजन करू नये व विनाकारण रस्त्यावर येऊ नये, असे त्यात नमूद केले आहे.
आपल्या घरात साजरी केलेली जयंती व्हाट्सएप, फेसबुक व स्टेटसला देखील ठेऊ शकता. या माध्यमातून साजरी केलेली जयंती समाजापर्यंत पोहचेल. मात्र झेंडे, बॅनरचे जाहीर प्रदर्शन नको. त्याच प्रमाणे मागील वर्षी साजरी केलेल्या जयंतीचे फोटो प्रसारित करू नये, जेणेकरून विनाकारण गैरसमज निर्माण होणार नाही. करोनाचा धोका ओळखून सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी तालुकाध्यक्ष शांताराम संगारे, तालुकाध्यक्ष गौतम पवार, जिल्हा संघटक रमेश शिरकांडे, राज्य संघटक सुरेश देठे, संदीप शिंदे, कमलेश कसबे, शंकर संगारे, राजेंद्र आव्हाड, बाळासाहेब सरोदे, सावळेराम गायकवाड, शहराध्यक्ष सचिन खरात, प्रवीण देठे, किशोर शिंदे आदींनी केले.