सातारा : करोनाच्या साथीमुळे सर्वत्र नकारात्मकता पसरली असताना दक्षिण मुंबईतील एका 34 वर्षीय महिलेमुळे थोडी सकारात्मकता निर्माण झाली आहे. तेथील एका खासगी रुग्णालयातून पूर्ण बरी होऊन ही महिला तिच्या घरी परतली. त्यावेळी तिने सांगितले की, या जीवघेण्या आजाराशी लढताना तुम्ही तुमचे मनोबल टिकवून ठेवले पाहिजे. या महिलेला सतत सर्दी होती, पण कफ किंवा ताप नव्हता. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने तपासणी करून घेतली, तेव्हा कोव्हिड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे निदान झाले, तेव्हा या महिलेच्या शारीरिक स्थितीपेक्षा मानसिक स्थिती अत्यंत ढासळलेली होती.
राज्यभरात सुरु असलेले लॉकडाऊन आणि प्रवासाचा पर्याय उपलब्ध नसल्याने या महिलेने मुंबईतील एका स्थानिक रुग्णालयाशी संपर्क साधला. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट असलेली विशेष रुग्णवाहिका या महिलेच्या घरी पाठवण्यात आली. आयसोलेशन अर्थात विलगीकरणाची समर्पित सुविधा असलेल्या कक्षात या महिलेला दाखल करण्यात आले. त्यानंतर या महिलेची तपासणी करून कोव्हिड-19 पॉझिटिव्ह असल्याची खात्री करून घेण्यात आली. उपचारादरम्यान या रुग्णाला श्वासोच्छ्वासाचा त्रास झाला नाही. ती हेमोडायनॅमिकली स्थिर होती. तिच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. ते कोव्हिड निगेटिव्ह आल्याने या महिलेला घरी पाठवताना रुग्णालयातले कर्मचारीही आनंदी दिसले.
बृहन्मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरी जाण्यापूर्वी संस्थात्मक अलगीकरणाचे पालन करेन, अशी प्रतिज्ञा या महिलेने केली. या साथीच्या आजाराशी लढा देण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा सिंहांचा वाटा आहे. पूर्णपणे संरक्षित स्थितीत या कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने उपचार प्रक्रियेत या महिलेची सेवा केली. वैयक्तिक जबाबदारी म्हणून या महिलेने लहानलहान गोष्टी स्वत:च केल्या. तिने आरोग्यसेवकांना वारंवार बोलावून त्रासही दिला नाही.
काही जण अजूनही कोव्हिड-19 ला गांभीर्याने घेत नाहीत, तर अनेक जण घाबरून जात आहेत. हा आजार गंभीर आहे. मात्र, तुम्ही सर्व प्रतिबंधात्मक उपाय केले, वेळेवर वैद्यकीय मदत घेतली, अचूक वैद्यकीय नोंदी दिल्या आणि उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यास तुम्ही या आजारावर नक्की मात करू शकता. या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय उपचारांसोबतच मनोवैज्ञानिक सामर्थ्यही आवश्यक असते, असे या महिलेवर उपचार केलेल्या डॉक्टरांनी सांगितले.
जगातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतही शिरकाव करणाऱ्या या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने जी वेगवान आणि कठोर पावले उचलली आहेत, ती प्रशंसनीय आहेत. त्यामुळे करोनाविरुद्धच्या लढ्यात आपण नक्की यशस्वी होऊ, अशी खात्री मला आहे, अशा भावना या महिलेने रुग्णालयातून घरी जाताना व्यक्त केली.