नवी दिल्ली – आयपीएल करोनाच्या सावटातही खेळविली जावी यासाठी अट्टहास करणाऱ्यांना कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने चांगलीच चपराक दिली आहे. देशवासियांच्या जीवाला महत्त्व द्या आयपीएलला नाही, अशा शब्दात पुजाराने परखड मत मांडले आहे.
एकीकडे देशात करोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. यावेळी पीडितांच्या मदतीसाठी पुढे येण्याएवजी काही जण आयपीएल खेळविण्याचा हट्ट सोडत नसल्याचेही दिसत आहे. हे अत्यंत खेदजनक आहे. स्पर्धा काय नंतरही खेळविता येतील. मात्र, समोर धोका दिसत असतानाही डोळ्यांवर पट्टी बांधून वर्तन करणे योग्य नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करत आहे. डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात टाकून रुग्णांवर उपचार करत आहेत. अशा परिस्थितीत स्पर्धा खेळविण्याचा विचारच काही लोकांच्या डोक्यात येतो याचेच आश्चर्य वाटते, अशा शदात पुजाराने फटकारले आहे.
नागरिकांचा जीव धोक्यात आहे. यावेळी त्यांना आधार देणे महत्त्वाचे आहे. जर कोणाला तेही जमत नसेल तर निदान त्यांची भीती तरी वाढवू नये. एकवेळ मैदान रिकामे ठेवू पण आयपीएल खेळवू असे मत मांडणाऱ्यांची मला खरेच किव करावीशी वाटते. जग एकविसाव्या शतकात असताना लोकांच्या भावना बोथट झाल्याचे अशा कृतीतून दिसत आहे. प्रत्येक खेळाडूला स्पर्धा कधी सुरू होतात याची काळजी वाटणे स्वाभावीक आहे. मात्र, त्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालणे किंवा तसा विचार करणे ही एक शोकांतिका आहे, अशी नाराजीही पुजाराने व्यक्त केली.
देशात लॉकडाऊन आहे त्यामुळे खेळाडूच नव्हे तर नागरिकही घरातच आहेत. त्यांनीही निराश होण्यापेक्षा परिवारासाठी वेळ देता येतो असा सकारात्मक विचार करायला हवा. क्रिकेटपटूंबाबत बोलायचे तर सातत्याने सामने होत आहेत. अशा वेळी परिवाराला वेळ देता येत नाही मग मिळालेला वेळ त्यांच्यासह व्यतित करा, असा सल्लाही पुजाराने दिला आहे.