मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यसरकारकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांसाठी आता राज्यसरकारने प्रभावी उपाययोजना अवलंबणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. याभागात राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्यातही गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्यंमत्र्यांनी सांगितले की, मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्याच्या मुद्यावर विशेष उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ काळजी वाढवणारी असून याबाबत मुंबईच्या लोकप्रतिनिधी जे मंत्रिमंडळातील सदस्य आहेत त्यांनी त्यांचे निरीक्षणे मांडली. गर्दी आणि दाटीवाटीच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.
दाटीवाटीच्या ठिकाणी लॉकडाऊनचे पालन सक्तीने झाले पाहिजे. ते अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्याबाबत गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात यावे. गर्दीचे संनियंत्रण महत्वाचे असून आता त्यासाठी नियंत्रण कक्षाच्या मदतीने सीसीटिव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते. मात्र रस्त्यांवरील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबाबत निर्णय झाला.
सीसीसीटिव्ही, एसआरपीएफ, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून लॉकडाऊनचे पालन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. धारावीसारख्या दटीवाटीच्या ठिकाणी जे सार्वजनिक स्वचछतागृहे आणि शौचालये आहेत. त्याचा वापर दिवसभरात मोठ्या प्रमाणावर होतो. अशा ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आणि पॉवर जेटचा वापर करून हे शौचालये वारंवार स्वच्छ करणे, ड्रोनचा वापर करून निर्जुतकीरणासाठी फवारणी कराण्याचे काम करावे, असे यावेळी त्यांनी सांगितले.