कोलकता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसने मन बदलून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. खासदार विकास निधी स्थगित केला जाऊ नये, अशी आग्रही मागणी त्या संवादावेळी तृणमूलकडून करण्यात आली.
मोदींबरोबरच्या संवादात सहभागी होणार नसल्याचे तृणमूलने आधी जाहीर केले होते. मात्र, पक्षाने तो निर्णय बदला. त्यानंतर तृणमूलचे नेते सुदीप बंडोपाध्याय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले. करोनाविरोधी लढ्यासाठी पश्चिम बंगालला 25 हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्याची मागणी ममतांनी याआधीच केली आहे. ती मागणी बंडोपाध्याय यांनी मोदींकडे मांडली.
खासदारांना विकास निधीमुळे तळागाळापर्यंत विकासकामे पोहचवणे शक्य होते. त्यामुळे त्या निधीला स्थगिती देऊ नये. प्रसंगी आमचे खासदार पूर्ण वेतन सोडण्यात तयार आहेत, असेही बंडोपाध्याय यांनी म्हटले. करोनाविरोधी लढ्यासाठी निधी जमवण्याच्या उद्देशातून मोदी सरकारने अलिकडेच काही निर्णय घेतले. त्यानुसार, खासदार विकास निधी दोन वर्षांसाठी स्थगिती करण्यात आला आहे. त्याशिवाय, खासदारांच्या वेतनात 30 टक्के कपात करण्यात आली आहे.