मुंबई – देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कुणालाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे. मात्र, तरीही काही जण बेकायदेशिररित्या वाहतूक करत असल्याचे समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी अशाच एका ट्रकला ताब्यात घेतले आहे. या ट्रकमधून तब्बल 50 लोकांची वाहतूक केली जात होती. मुंबई पोलिसांनी अनाधिकृतरित्या लोकांची वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे.
या ट्रकच्या पुढे “अतिआवश्यक सेवा’ असा बोर्ड लावलेला होता. हा ट्रक मुंबई ते लखनऊ जाणार होता. या ट्रकमधून प्रवास करत असलेल्या लोकांकडून प्रत्येकी तब्बल 2 ते 3 हजार रुपये घेतले जात होते.
या प्रकरणी जेजे मार्ग पोलिसांनी कारवाई करत ट्रक ताब्यात घेतला आहे. तर ट्रक चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचारबंदी आणि इतर कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तर या ट्रकमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना चौकशीनंतर सोडण्यात आले आहे.