नवी दिल्ली- करोना व्हायरसमुळे जगभर हाहाकार उडाला आहे. त्यामुळे जगातील विविध बोटीवर,जहाजावर आणि क्रूझवर काम करीत असलेले भारताचे 40 हजार खलाशी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. या सर्वांना परत देण्याबाबत सरकार प्रयत्न करीत आहे.
जगभरात चालत असलेल्या क्रुझ, मालवाहतूक जहाज आणि प्रवासी जहाजावर हे भारतीय लोक काम करीत आहेत. मात्र करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अशा जहाजांना विविध देशांनी नांगर टाकण्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ही सर्व जहाजे समुद्रामध्ये आहेत. भारत सरकारने चालू केलेले लॉक डाऊन 14 एप्रिल रोजी संपणार आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना मायदेशी करण्याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
40 हजार पैकी 15हजार खलाशी 500 मालवाहतूक जहाजावर आहेत तर 25 हजार लोक क्रूज वर आहेत. जहाज वाहतूक संघटनांनी याबाबत जहाज मंत्रालयाकडे विचारणा केली आहे. जहाज मंत्रालयाने याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. लॉक डाउन संपल्यानंतर या सर्व लोकांना शक्य तितक्या लवकर भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर या लोकांना भारतात आणले तरी सुरुवातीला त्यांची कोरोनाव्हायरस बाबत चाचणी घेतली जाईल आणि 14 दिवस त्यांना वेगळे ठेवण्यात येईल असे जहाज मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. जहाज उद्योगातील कंपन्या आणि या कंपन्यांच्या संघटनांनी जहाज मंत्री मनकुशलाल मंडविया यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा केली.
सध्या हे कर्मचारी, खलाशी व पर्यटक ज्या ठिकाणी अडकले आहेत त्या ठिकाणी त्यांना पुरेसे अन्न आणि पाणी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवृत्त खलाशी किंवा त्यांच्या विधवासाठी ही जहाज मंत्रालय योजना घेऊन येत आहे. करोना व्हायरस संपल्यानंतर मालवाहतूक वेगाने करावी लागणार आहे. यासाठी तयारी करण्याचे आवाहन मंत्रालयाने जहाज कंपन्यांना केले आहे.