जिनिव्हा: करोना विषाणू संसर्गामुळे जागतिक अन्न वितरण साखळीवर सध्यातरी फारसा परिणाम झाला नसला तरी अन्नाची आयात प्रभावी झाल्यास त्याचे परिणाम पुढे जाणवू शकतील असा इशारा डब्ल्यू एफ पी अर्थात जागतिक अन्न कार्यक्रमाने दिला आहे. सध्यातरी जागतिक स्तरावर अन्नधान्याचे वितरण सुरळीत सुरू असून याचे दरही आटोक्यातत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने दिली आहे.
करोना संसर्गापासून लोकांचे प्राण वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्र्स घेब्रेसस आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालीना जॉर्जीव्हा यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी कोविड-19 ला रोखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तरीही त्वरित योग्य संतुलन साधणे अशक्य असल्याचे ते म्हणाले. जगातली जवळजवळ अर्ध्याहून अधिक लोकसंख्या लॉकडाऊनमुळे घरीच असल्याने अर्थव्यवस्थेला बाधा पोहोचल्याचे त्यांनी म्हटले आहे.