वॉशिंग्टन – करोनामुळे निर्माण झालेल्या अभुतपूर्व आर्थिक संकटाच्या काळात भारतातील उपेक्षित गरीब वर्गाला अधिक मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने या वर्गाच्या मदतीसाठी अमेरिकेतील अमेरिकन इंडिया फाउंडेशनने पुढकार घेतला आहे. 2001 साली गुजरातमध्ये आलेल्या मोठ्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर गुजराती बांधवांना मदत करण्यासाठी हे फाउंडेशन स्थापन करण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात भारतातील वैद्यकीय मदतीचे काम करणाऱ्या पथकाला मदत दिली जाणार आहे.
या फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पांडे यांनी म्हटले आहे की, भारत हा गरीब देश असून करोनामुळे निर्माण झालेल्या अर्थिक संकटाचा अत्यंत भीषण परिणाम तेथील असंघटित क्षेत्रातील कामगारांना आणि अन्य गरीब वर्गाला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. नोकरी गमावणे, मुलांच्या शिक्षणात खंड पडणे, गरिबीमुळे समाजापासून कुटुंब अलग पडणे, असे परिणाम भारतातील गरीब वर्गावर होऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर फाउंडेशन या वर्गाला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहे. या फाउंडेशनने आत्तापर्यंत सन 2004 साली आलेली सुनामी, 2008 साली बिहारमध्ये आलेला पूर, सन 2014 साली काश्मिरात आलेला पूर, सन 2015 साली चेन्नईत आलेला पूर आणि सन 2018 साली केरळात आलेला पूर अशा आपत्तीत मोठी मदत केली होती. सध्याच्या करोना आपत्तीच्या काळात भारतातील 24 जिल्ह्यांतील सुमारे साडेपाच कोटी कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता या फाउंडेशनने व्यक्त केली आहे.