नवी दिल्ली – देशावरील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सध्या देशभरामध्ये सध्या २१ दिवसांचा लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. लॉक डाऊनच्या काळात भारतातील बहुतांश नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत स्वतःला घरामध्येच कैद करून घेतलं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येत्या रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील लाईट्स बंद करून दिवे, मेणबत्ती अथवा मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला चिन्हांकित करण्याचे आवाहन केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाचे पालन केल्यास वीजपुरवठ्याचे डिमांड व सप्लाय गुणोत्तर बिघडून तांत्रिक घोटाळा निर्माण होऊ शकतो अशी अटकळ काही विरोधपक्षाच्या नेत्यांनी बोलून दाखवली होती. याबाबत आता खुद्द केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून खुलासा करण्यात आला असून काहींकडून वीजपुरवठ्याबाबत व्यक्त करण्यात आलेली चिंता चुकीची असल्याचं स्पष्ट केलंय.
याबाबत ऊर्जा मंत्रालयाने केलेल्या खुलास्यात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ घरातील विजेचे दिवे बंद करण्याचे आवाहन केले असून घरातील विजेवर चालणारी इतर उपकरणे, पथदिवे हे सुरूच राहणार आहेत. याव्यतिरिक्त रुग्णालयांमधील दिवे देखील सुरु ठेवण्यात येणार आहेत. मंत्रालयाकडून स्थानिक पातळीवरील संबंधितांना पथदिवे सुरु ठेवण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेत.’
‘काहींनी घरातील विजेचे दिवे बंद केल्याने ग्रीड फेल्युअर होऊन विजेवर चालणाऱ्या इतर उपकरणांमध्ये बिघाड होईल अशी चिंता व्यक्त केली होती. मात्र ही चिंता चुकीची असून अशी कोणतीही परिस्थिती ओढवणार नाही.’ असे देखील ऊर्जा मंत्रालयातर्फे सांगण्यात आलंय.
No call to switch off street lights or appliances in homes. Only lights should be switched off. The lights in hospitals &other essential services will remain on. Local bodies have been advised to keep street lights on for public safety: Ministry of Power https://t.co/l3cY8ajwH9
— ANI (@ANI) April 4, 2020