इस्लामपूर – वाळवा व शिराळा तालुक्यातील कोणीही बेघर, मोलमजुरी करणारी व्यक्ती उपाशी राहणार नाही. ज्यांचे हातावर पोट आहे. अशा व्यक्तींना तातडीने अन्नधान्य पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. तीन ठिकाणी शिवभोजनाची सुरवात करा, इस्लामपूर शहराचे तातडीने निर्जंतुकीकरण करा, शहरातील सर्व खासगी दवाखाने व मेडिकल बंद राहिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
करोना बाधित परिस्थितीचा सोमवारी सायंकाळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला. येथील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. खा. धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित राऊत, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, वाळवा व शिराळा तालुक्यातील आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या दक्षता घाव्यात. इस्लामपूर शहरात करोनाने बाधित झालेल्या कुटूंबाच्या संपर्कात कोणी आले आहे का? याची शहानिशा करावी. आवश्यक असणाऱ्याना होम क्वारंटाईन करावे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती कामात अडथळा निर्माण करू नका. मळणी मशीन, ट्रॅक्टरसाठी डिझेल पुरवठा करावा.
पोलिसांनी अनावश्यक मारहाण करू नये. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय घरातून बाहेर पडू नये. इस्लामपूर, शिराळा, आष्टा येथे शिवभोजनाची सुरवात करून गरजूंना जेवण उपलब्ध करुन द्यावे. महामार्गावर लोक चालत जात आहेत. त्यांना काय सुविधा उपलब्ध करून देता येतील का? याबाबत विचारणा झाली. प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तरीही आज कवठेमहांकाळ, जत परिसरात नागरिक मजूर स्थलांतर करण्यासाठी चालत आले आहेत.
त्यांच्यावर संबंधित तहसीलदार व प्रांताधिकारी लक्ष ठेवत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, नगरसेवक संजय कोरे, चिमन डांगे, खंडेराव जाधव, डॉ. संग्राम पाटील, शहाजी पाटील यांनी इस्लामपूर शहराच्या विविध प्रश्नांबाबत सूचना मांडल्या. प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, आरोग्य अधिकारी साकेत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. अशोक शेंडे यांनी तालुक्यातील परिस्थितीबाबत माहिती दिली.