काय आहे निर्भया खटला?
२०१२मध्ये राजधानी दिल्लीत घडलेली ही घटना. महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली निर्भया ही तिच्या मित्रासोबत सिनेमा पाहून घरी परत येत असताना नवी दिल्ली येथील मुनीरकापासून द्वारका या ठिकाणी जाण्यासाठी या दोघांनी बस पकडली. या बसमध्ये बसल्यावर फक्त पाच ते सात प्रवासी होते. प्रवास सुरु झाल्यानंतर बसलेल्या इतरांनी निर्भयासोबत छेडछाड करण्यास सुरुवात केली. यामध्ये तिच्या मित्रानं हस्तक्षेप केला तेव्हा त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहारण करण्यात आली. यानंतर सहा आरोपींनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तिचा अमानुषपणे लैंगिक छळही केला. यानंतर विविस्त्र अवस्थेत निर्भया आणि तिच्या मित्राला बसबाहेर फेकून देण्यात आलं. यानंतर उपचारादरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना आज पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं. निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला. यानंतर देशातील नागरिकांनी निर्भयाला न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बॉलिवूडमधील देखील अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरच्या माध्यमातून न्यायावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
दोषींना फाशी देण्याचा पाच मार्च रोजी चौथे ‘डेथ वॉरंट’ काढताना न्यायालयाने २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फाशीची वेळ निश्चित केली होती. चालू वर्षात २२ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी दोषींना फासावर चढविण्यासाठी काढण्यात आलेले ‘डेथ वॉरंट’ कायद्यातील पळवाटांमुळे निष्प्रभ ठरले होते.
‘निर्भया प्रकरणात उशीर झाला आहे. इतक्या वर्षांनी न्याय मिळाला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज समोर येत आहेत. या घटना थांबवायच्या असतील तर इतका उशीर करून चालणार नाही. तात्काळ पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. असे न झाल्यास अशा घटना थांबणार नाहीत’.
इतक्या वर्षांनी निर्भयाला न्याय मिळाला. मात्र, निर्भयाची आई आणि तिचे कुटुंब अनेक त्रासातून गेलेले आहेत. एवढा त्रास कोणालाही होऊ नये असे माझे मत आहे. बलात्कार प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे.
– संकेत किसन देशपांडे,
कॉलेज रिपोर्टर,
आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे