नवी दिल्ली – करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर जो लॉकडाऊन जाहीर झाला आहे त्यामुळे संपूर्ण देशातील अंतर्गत विमानसेवा येत्या 14 एप्रिलपर्यंत बंदच राहील, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या आधी ही विमानसेवा 31 मार्चपर्यंत बंद राहील, असे घोषित करण्यात आले होते; पण विमान वाहतूक महासंचालनालयाने त्या बंदीची मुदत वाढवण्यात येत असल्याचे कळवले आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक या आधीच 15 एप्रिलपर्यंत बंद राहील असे जाहीर करण्यात आले आहे.
विमाने बंद ठेवण्यात आल्याने विमान कंपन्यांनी आपल्यावरील खर्चाचा ताण कमी करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना विनावेतन घरी बसवले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या संबंधात भविष्यात भीषण स्थिती उद्भवणार आहे, असे या कर्मचारी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेची सेवाही दरम्यानच्या काळात बंदच राहणार असल्याने लोकांची मोठीच अडचण निर्माण झाली आहे. सध्या फक्त रेल्वेच्या मालगाड्यांनाच अनुमती देण्यात आली आहे. त्यातून जीवनावश्यक वस्तुची नेआण केली जात आहे.