ओंकार दळवी
जामखेड – जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांची दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली.गर्दीतून पुन्हा करोनाचे संक्रमण टाळण्यासाठी म्हणून अंतर ठेवा असे वारंवार सांगूनही लोक ऐकत नाहीत. हे पाहून आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने शहरातील भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांमध्ये गर्दी होऊ नये आणि त्यांच्यात सुरक्षित अंतर राहावे यासाठी एक जुगाड शोधून प्रशासनाच्या सहकार्यातून प्रत्यक्षात आणले असून लवकरच संपूर्ण तालुक्यात अशा प्रकारे सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी अत्यावश्यक सेवा आणणाऱ्या जामखेड तालुक्यातील सर्व गावातील दुकानासमोर मार्किंग केले जाणार आहे. दरम्यान असा उपक्रम करणारे जामखेड हे जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे शहर ठरले आहे.
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनही अहोरात्र प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात 3 करोना संशयित आढळून आले आहेत. संचारबंदी असतानाही नागरिक घराबाहेर पडत असून, रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कायम आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना मास्क बांधण्यासह एकमेकांमध्ये अपेक्षित अंतर सोडण्यात येत नाही.
ही गंभीर बाब पाहता आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून यांनी आधी भाजीपाला खरेदी करण्याऱ्या नागरिकांना जीवनावश्यक आस्थापनांच्या समोर किमान तीन तीन फुटांचे मार्किंग करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यास सुरुवात देखील झाली असून गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, जामखेड नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना सुचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार जामखेड शहरातील नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी अनोखी’ व्यवस्था केली. जामखेड येथे भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या लोकांमध्ये सुरक्षित अंतर’ ठेवण्यासाठी दुकानाबाहेर ठराविक अंतरानंतर रिंगण किंवा चौकट आखले आहेत. दुकानांबाहेर चौकोनी बॉक्स करून किंवा रांगोळीचे गोल आखण्यात आले. दोन चौकोनात एक ते दोन मीटर अंतर सोडण्यात आले आहे.
या गोलामध्ये नागरिकांना उभे राहायला सांगितलं जात आहे. जसा नंबर येईल तसा एक एक गोल पुढे सरकायचे अशा पद्धतीने नियम पाळला जात आहे. वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्यानं अखेर अशा पद्घतीने अवलंब करावा लागत आहे. भाजीपाला विक्रेत्यांच्या समोर चुन्याद्वारे तीन- तीन फुटांचे बॉक्स मारले आहेत.
एकाच ठिकाणी केवळ तीन ते चार बॉक्स मारले जात आहे. जेणेकरून पाच पेक्षा अधिक नागरिक एका ठिकाणी येणार नाहीत, याची दक्षताही घेण्यात येत आहे. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना त्या चौकटीत उभे राहावे लागते. एकप्रकारे ही मॅन टू मॅन मार्किंग’ करण्यासारखी पद्धत असल्याने नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. तसेच तात्काळ तालुक्यातील सर्व गावातील अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानासमोर असे प्रकारचे मार्किंग केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यातही प्रत्येक गावात मार्किंग होणार
21 दिवसांचा लॉकडाऊन झाल्यावर नागरिकांनी भयभीत होऊन अत्यावश्यक दुकानावर एकच गर्दी केली आहे.याला आळा घालण्यासाठी जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावातील दुकानासमोर गोळ मार्किंग केले जाणार आहे.
एका ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये आणि त्यांच्यामध्ये तीन फुटांचे अंतर रहावे, यासाठी सर्वच जीवनावश्यक आस्थानांच्या समोर तीन – तीन फुटांचे मार्किंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही नागरिक आजही घराबाहेर पडत आहेत. करोना विषाणूचा लढा हा सर्वांनी लढायचा आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने घरात थांबावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये. करोनाबाबत जिल्हा प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे.