लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत मग स्त्री असो की पुरुष कोणालाही होऊ शकतो असा रक्तक्षय. का होतो हा? आणि कशी करतो उपाययोजना आपण? आहाराला महत्त्व आहे का हा विकार होऊ नये म्हणून आणि झाला असेल तर बरा व्हावा म्हणून? तर हो आहारला प्रचंड महत्त्व आहे हा विकार बरा करण्यात आणि टाळण्यात.
एक तर हा झालेला बऱ्याचदा उशिरा लक्षात येतो. आणि लक्षात आला की आपण डॉक्टरकडे जाऊन औषध उपचार घेतो आणि आयर्न टॉनिक घेऊन येतो. पण त्याने तात्पुरता फरक पडतो परत परिस्थिती जैसेथे! असे का बरे होते?
तर लोह या अतिसूक्ष्म प्रमाणात लागणाऱ्या क्षाराचे प्रमाण शरीरात एकूण क्षाराच्या तुलनेत 1% इतके असते. “हेमे’ म्हणजे लोह आणि ग्लोबीन म्हणजे प्रथिनाचा भाग यापासून हिमोग्लोबिन तयार होते जे रक्तात असते आणि ते शरीरात ऑक्सिजन पोचवते.
लोह आपल्या नैसर्गिक अन्नात असतेच; परंतु ते रक्तात जाऊन त्याचा उपयोग होण्याकरिता इतर अन्नघटकांची मदत लागते. यात कॉपर, मॅग्नेसियम, जीवनसत्व इ, पूर्ण प्रथिने, जीवनसत्व ब 6, जीवनसत्व क. त्यामुळे नुसते टॉनिक घेऊन काही फायदा होत नाही. त्याच्याबरोबर व्यवस्थित पूर्ण आहार करावा लागतो. जीवनसत्वांअभावी जो ऍनिमिया होतो तो ओळखून उपाययोजना करावी लागते. नाहीतर अतिरिक्त टॉनिकमुळे अपाय होऊ शकतो. म्हणून आधी ऍनिमिया कशामुळे झाला आहे, कोणत्या प्रकारचा झाला आहे, ते चाचणी करून मगच औषध घेता येईल तेही पूर्ण आहाराची जोड देऊनच.
लहान बाळांना सुद्धा ऍनिमिया होतो. तो आईच्या शरीरात लोहाची कमतरता असल्याने होतो. कितीतरी गरोदर बायकांना गरोदरपणातसुद्धा हा त्रास होतो याचे कारण अनेक वर्षांपासून आहारत असलेली प्रथिनांची कमतरता आणि माता होण्यासाठी आपले शरीर सक्षम आहे का ते आधी न तपासून पाहणे.
गर्भात असतानाच बाळ स्वतःचा लोहाचा साठा करत असते आणि जर आईलाच कमतरता असेल तर त्याचा त्रास आईला तर होतोच पण त्या बाळालसुद्धा होतो. नंतर थोडे बाळ मोठे झाले की त्याला 9 महिन्यांपासून थोडेथोडे सगळे खाण्याची सवय लावली नाही तर ते मूल पण ऍनिमिक होते. कारण नुसत्या दुधाने आजिबात पोषण होत नाही.
दुधात चांगले अन्नघटक असले तरी त्यात क जीवनसत्व आणि लोह अजिबात नसते. सहा महिन्यांनंतर बाळाच्या पाचक रसांच्या दृष्टीने काही बदल होतात. त्याप्रमाणे दुधाचा वापर कमी करून इतर अन्नाचा वापर सुरू केला नाही तर दुधाचे पूर्ण पचन होत नाही आणि त्या बाळाची वाढ पण नीट होत नाही.
यासाठी “विनिंग फूड’ म्हणजेच आईच्या दुधावरून बाजूला करून इतर अन्नपदार्थ ज्या प्रथिने व बाकी जीवनसत्व आहेत, ती देणे हे खूप जास्त महत्त्वाचे असते. त्यातच खूप पौष्टिक जेवण म्हणून खूप बाळांना नुसता दूध भात की तूप भात भरवतात. यातून फक्त कर्बोदके आणि स्निध पदार्थ मिळतात.
परत एकदा प्रथिने व जीवनसत्वाचा आभाव निर्माण होतो ते पण ऐन वाढीच्या वयात जेव्हा बाळाचा मेंदूसुद्धा वाढत असतो. म्हणून आपण पौष्टिक कशाला म्हणतो, ते आपल्या मनाने की पूर्वी चालत आलं त्याप्रमाणे न ठरवता आहार तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर जास्त प्रकारचे वेगवेगळे खाऊ ते सुचवू शकतात जे करायला व पचायलाही सोपे असतात आणि खऱ्या अर्थाने पौष्टिक पण असतात.
प्रौढांना होणाऱ्या ऍनिमियाची कारणे शोधायचे ठरवले तर आधी समोर येतो तो कामाचा ताणतणाव, नीट जेवायला न मिळालेला वेळ आणि त्यामुळे समोर येईल मिळेल ते खाणे व भूक भागवण्याचे प्रकार. त्यातही अतिरिक चहाचे सेवन तेही जेवण झाल्यावर.
या जेवणानंतरच्या चहा-कॉफीमुळे जेवणातून जे काही अन्नघटक गेले ते रक्तात जाण्यापासून रोखले जातात. घरातच असलेल्या स्त्रियांना मग का होतो हा ऍनिमिया, जर त्यांना वेळ असतो आणि घरातच जेवता येतं? तर त्यांचे अज्ञान आणि वर्षनुवर्ष ठरलेल्या पदातीचे जेवण घेण्याचा अट्टाहास. आपल्याला बदल म्हणजे हॉटेलमधून एखादी भाजी आणणे एवढेच माहीत असल्यासारखे झाले आहे. पण घरातच पौष्टिक पदार्थ जेवणाला आपण करू शकतो, हे सुचत नाही किवा ते केले जात नाही.
तर मग कसे मिळवता येईल लोह अन्नातून?
नुसते लोह असलेल्या पदार्थांची यादी आपल्याला नको आहे कारण ती आता बऱ्याच पुस्तकांमधून पण मिळेल. तर ते लोह रक्तात मिसळण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यता असते आणि ते सुद्धा कशातून मिळतील आणि हे सगळे अन्नघटक एकत्रित आपल्याला कसे घेता येतील याचा विचार करायला हवा.
मांसाहारात असलेलं लोह हे पटकन रक्तात मिसळते. त्याचा अनिमियामध्ये खरंच उपयोग होतो. परंतु शाकाहारी जेवणातून हे लोह मिळवण्यासाठी बरेच अन्नघटक लागतात. शाकाहारी पदार्थांमधून मिळालेलं लोह रक्तात मिसळण्यासाठी क जीवनसत्वाची गरज असते. म्हणून जेवणात लिंबाची फोड हवी. कोथिंबीर, पुदिना, हिरव्या भाज्या, आख्खा मसूर, बाजरी, गूळ, खजूर, काकवी, आळू यात बरेच लोह असते. पीठ फुगवून पदार्थ करणे, कडधान्य मोड आणून खाणे यातून बाकीचे आनाघातक मिळून लोह शरीरात पोचू शकते.
पूर्ण प्रथिने मिळण्यासाठी किमान एक वेळच्या खाण्यात तरी प्रथिनांचा म्हणजेच धान्य व डाळ एकत्र येईल असे आण घ्यावे. 1, 2 चमचे तरी घरचे तूप जेवणात घेता येईल. घरी काढलेले ताजे लोणी खाता येई. तेल बिया, फळे रोज खायला हवे.
सगळ्यात महत्त्वाचे की, भूकेच्या वेळी हे सगळे आपण खायला हवे. कारण जठारामधले हायड्रोक्लोरिक आम्ल हे लोहाच्या अभिशोषणामध्ये महत्त्वाचे असते. भूक लागलेली असताना जे वडापाव, समोसे, केक, चहा, कॉफी यांनी पोट भरून घेतले तर हा ऍनिमिया कधीच पाठ सोडणार नाही.
पूर्वी गरीब लोकांना हा आजार जास्त होता. कारण त्यांच्याकडे खायला काही नसते असे वाटायचं; पण आता सधन कुटुंबातील लोकांना पण हा विकार होतो कारण आपल्या बदलत चाललेल्या सवयी आणि आपली बदललेली अभिरुची.
– प्रज्ञा पिसोळकर