करोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त गाठी व कडे केले अर्पण
सोनई – शनिशिंगणापूर देवस्थानच्या चारशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याला स्वयंभू शनिमूर्तीवर भाविकांनी आणलेल्या कावडीचे पाणी पडले नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानने शनिदेवास फक्त गाठी व कडे अर्पण केले. यावेळी कावडीद्वारे पाणी आणलेल्या भाविकांनी या सृष्टीवर पसरलेली रोगराई हटू दे, सर्वांना आनंद व समाधान लाभू दे, असे साकडे देवाला घातले.
देवस्थान सुरक्षा विभागाने करोना संसर्गाची काळजी म्हणून काशी (वाराणसी) येथून गंगेचे पाणी घेऊन आलेल्या सर्व भक्तांना नगर-औरंगाबाद राजमार्गावर अडवून गंगाजलाने शनिमूर्तीवर अभिषेक करता येणार नाही, असे सांगत त्यांना घरी पाठवले. तसेच प्रवरासंगम येथून कुणीही कावडीचे पाणी आणू नये, असे आवाहन सुरक्षाधिकारी गोरख दरंदले यांनी केले.
शिंगणापूर येथील शिवाजी चव्हाण, प्रकाश सोनवणे, मच्छिंद्र भगत, शिवाजी कुऱ्हे, बाळासाहेब वडागळे, दत्ता कुऱ्हे, महेश पतंगे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, अर्जुन होंडे, गजानन पंडित, अण्णासाहेब गांगले, बाबासाहेब शिंदे, काशिनाथ लल्ला, तुकाराम तेजीकर हे चौदा शनिभक्त श्रीक्षेत्र काशी येथे मोटारसायकलवर कावड यात्रेला गेले होते. मात्र त्यांना पोलीस प्रशासनाने जल अर्पण करण्यास मनाई केली. भक्तांनी नाराजी व्यक्त केली. मात्र मनात शनिभक्ती असल्याने त्याचा आनंदही व्यक्त केला. देवस्थानने गुढीपाडवा सोहळा रद्द केलेला असून, महंत त्र्यंबक महाराजांच्या हस्ते सकाळी आरती झाली. पुरोहित अशोक देवा कुलकर्णी यांनी प्रवरा संगम येथून पवित्र जल आणून सकाळी शनिदेवला जलाभिषेक केला.