पुणे – देशावर करोना विषाणूसारखे मोठ्या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस दिवस-रात्र काम करत आहेत. राज्यात करोनाचा पहिला रूग्ण सापडल्यापासून आतापर्यंत अनेक डॉक्टरांना विश्रांती मिळालेली नाही. ते स्वत:चा जीव धोक्यात घालून रूग्णांना उपचार देत आहेत. त्यामुळे त्यांच्याही आरोग्याची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. तसेच, त्यांचा आरोग्य विमा काढण्याबाबत आलेल्या सूचनांबाबत मुंबई येथे तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुख्यालयात बसून सर्व यंत्रणा राबवित आहे. आजही ते पंतप्रधानांशी बोलणार असून, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
त्यामध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्री संपूर्ण ठिकाणी जावून तेथील आढावा घेत आहे. करोना बाधित किंवा संशयित व्यक्तींना उपचार देत असलेल्या डॉक्टरांना अनेक दिवसांपासून विश्रांती घेता आलेली नाही. ते ही माणूसच आहेत. त्यामुळे पर्यायी डॉक्टर त्याठिकाणी देऊन त्यांना काहीवेळासाठी विश्रांती मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच पोलीस विभागातही याचप्रकारे परिस्थिती असून, त्यांच्यासाठी होम गार्डची संख्या वाढविण्यात येणार असून, लवकरच त्यांची नियुक्ती करण्यात येईल, जेणेकरून पोलिसांनाही क्षणभर विश्रांती घेता येईल. यामध्ये महत्वपूर्ण भूमिका ही नागरिकांची असून, त्यांच्या सहकार्यातून हा प्रादुर्भाव रोखण्यात नक्कीच यश मिळेल. त्यामुळे नागरिकांनी हलगएर्जीपणा करू नये, प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
त्याचा बाप सांगोतय, अजून काय पाहिजे…
“पार्थ पवार सिंगापूरला गेले होते आणि ते नुकतेच आले’, असे पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आले. त्यावेळी “तो कोठेही गेलेला नाही, मागील दोन ते तीन महिन्यांत तो सिंगापूरला गेला नाही,’ पाहिजे तर तुम्हाला त्याचा पासपोर्ट दाखवितो, अशा स्पष्ट शब्दात पवार यांनी सांगितले. मात्र, आमच्याकडे तशी माहिती असल्याचे पुन्हा विचारल्यावर दादांनी त्यांच्या शैलीमध्ये बोलत “त्याचा बाप सांगतोय, तो सिंगापूरला गेला नाही,’ त्यापेक्षा अजून काय पाहिजे.’ असे सांगत पासपोर्ट आणून दाखवितो, असेही दादांनी सांगितले.