पुणे – करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले असले तरी पुणे शहराच्या उपनगरातील नागरिकांना अद्याप त्याचे गांभीर्य दिसत नसल्याचे चित्र आहे. आज दिवसभर अनेक भागात पाहणी केली असता नागरिक बेफिकीरपणे फिरताना दिसत होते. नागरिक एकत्रित गप्पा मारत आहेत, फिरत आहेत. जणू काही सुट्टीचा आनंद घेताना प्रत्येकजण दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात करोना रोखण्यासाठी प्रशासनाला कडक पावले उचलावी लागतील, अशीच स्थिती सध्या दिसत आहे.
जगभरात थैमान घातलेल्या करोना विषाणूचा संसर्ग हा भारतात सुद्धा झाला आहे. विशेष करून महाराष्ट्रात आणि ते ही पुण्यात करोनाचे संशयित रुग्ण अधिक आहेत. हा आकडा सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये बंद केली आहेत त्यापाठोपाठ अनेक खासगी कंपन्यांना सुट्टया दिल्या आहेत तर काही खासगी कंपन्यांनी आपल्या कामगारांना घरूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिनेमागृह मॉल सुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. व्यापारी असोसिएशनने शहरातील दुकाने बंद ठेवली आहेत. मोठी मोठी हॉटेल बंद आहेत. ऐवढी सगळी खबरदारी घेऊन सुद्धा नागरिकांमध्ये मात्र जागरूकता दिसत नाही.
शहराच्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता, डेक्कन जिमखाना, कुमठेकर रस्ता, नाना पेठ, शनिवार वाडा, मंडई तसेच पेठा या परिसरात जसा सकाळपासून शुकशुकाट दिसतो, तशी शांतता उपनगरात पाहायला मिळत नाही. उपनगरांतील प्रमुख रस्त्यांवर गर्दी कमी असली तरी अंतर्गत जे रस्ते आहेत ते नेहमी सारखेच गजबजलेले दिसत आहेत.
वारजे चौक, कात्रज डेपो चौक, मार्केटयार्ड, कर्वेनगर भाजी मंडई, बाणेर चौक, पाषाण गावठाण, पर्णकुटी चौक, गुंजन चौक, चंदनगर मधील अंतर्गत रस्ते, मगरपट्टा चौक, ससाणेनगर, फुरसुंगी नाका, कोंढवा गावठाण, खडी मशीन चौक, कात्रज-कोंढवा रस्ता या भागात जर आपण सकाळी किंवा संध्याकाळी गेला तर अजून ही आपल्याला वाहतूक कोंडी मध्ये अडकून पडावे लागते. त्याचबरोबर या परिसरातील मोठे मॉल किंवा हॉटेल बंद असले तरी छोटी दुकाने मात्र सुरू आहेत. त्यात विशेष करून खाद्य पदार्थ आणि चहा स्टॉलवर गर्दी जास्त दिसते. ही गर्दी पाहिली की नागरिकांमध्ये कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
उपनगरातील अनेक छोटी कार्यालये आणि खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्या दिल्या आहेत. जेणे करून त्यांनी घरात बसून राहवे. पण, सुट्टी मिळाल्याच्या आनंदात हेच कामगार जास्त फिरताना दिसत आहेत. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. शहरात सध्या निर्बंधाचे निर्देश लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत शहरात चार किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांनी एकत्रितपणे फिरू नये, असे असताना त्याचा फारसा फरक नागरिकांना पडलेला दिसत नाही. प्रशासनाने अद्याप याबाबत कडक पावले उचलली नसली तरी जर अशाच प्रकारे जागरूकता नागरिकांनी दाखविली नाही तर पोलीस प्रशासनाला या कायद्या प्रमाणे कारवाई करावी लागेल.
… तर पूर्ण शहर लॉकडाऊन करावे लागेल
चीन मधील वुहानमध्ये या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ज्याप्रमाणे पूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आले होते.त्याप्रमाणे पुणे शहर लॉक करण्याची वेळ येऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.नागरिकांनी खबरदारी घेऊन शक्यतो गर्दी करू नये.विनाकारण रस्त्यावर गप्पा मारत बसू नये.चहाच्या टपऱ्यांवर किंवा खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर गर्दी करू नये.तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधावा आणि अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे एवढी खबरदारी घेतली तरी आपण करोना रोखू शकतो अन्यथा पोलीस प्रशासनाला कायद्याचा बडगा उगारावा लागेल.