भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आंदोलन करण्याचा इशारा
नगर – शेतकऱ्यांकडे सक्तीने सुरु केलेली वीज बिलाची वसुली त्वरीत थांबवावी, तसेच सुरळीत वीजपुरवठा कायमस्वरुपी द्यावा, या मागणीचे भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले. शासन व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे.
माजी पालकमंत्री राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी तसेच ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहेत. मात्र, त्याच्या विरुद्ध परिस्थिती ग्रामीण भागांमध्ये सध्या दिसून येत आहे.
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुल करण्याचे काम सुरु केले आहे. ज्याठिकाणी रोहित्र नादुरुस्त झालेले आहेत, तेदेखील तातडीने बदलुन दिले जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची अडचण होऊन गावांमध्ये वीजपुरवठा नसल्याने गावचे गाव अंधारात राहत आहेत.
ग्रामीण भागात भारनियमन नसताना देखील कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित होतो व कधी अचानक परत येतो, त्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्या करोनाचा हाहाकार उडाला असल्याने सर्व जनता भयभीत झालेली आहे.
अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची वीजबिल न भरल्यामुळे व जाळलेली डीपी नवीन न दिल्यामुळे अनेक प्रसंग ओढवले गेले आहेत. जुलमी व अन्यायकारक पद्धतीने वसुली करुन नये, यामध्ये सुधारणा न झाल्यास भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.