नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी सुमारे 225 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
आमदार बेनके यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार बेनके यांनी मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात जुन्नर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 225 कोटींचा निधी आपल्या पहिल्याच अधिवेशनात मंजूर करून आणला आहे. यावेळी महाआघाडीतील कॉंग्रेस पक्षाचे विघ्नहर कारखान्याचे सत्यशिल शेरकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांना जमावबंदी कलम लागू असल्याने उपस्थित राहता आले नाही.
आमदार बेनके म्हणाले, जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंती सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरी पर्यटन विकास आराखडा अंतर्गत 23 कोटींचा निधी मंजूर केला आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांनी मागील पाच वर्षांत किल्ले शिवनेरी विकासासाठी आलेला 9 कोटींचा जो निधी रस्त्यासाठी वापरला. शिवनेरी किल्ल्यावर विकासकामांसाठी एकही रूपयाचा निधी वापरला नाही. या मंजुरीनंतर सोनवणे हे जुन्नर तालुक्यातील शिवसृष्टी बारामती येथे नेवून 100 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची टीका करीत आहेत.
मात्र, बारामती येथे 100 कोटी रूपयांची शिवसृष्टी निर्माण करण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे. या प्रस्तावास अद्याप मान्यता मिळाली नाही. बारामती नगर परिषदेची 25 एकर जागा संपादित करण्याचा विचार आहे. असे असताना सोनवणे हे त्यांच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करीत आहेत. आमच्या नेत्यांवर केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही.
किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी माजी आमदार वल्लभ बेनके यांनी एक छोटी शिवसृष्टी उभारली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून शिवसंस्कार सृष्टी उभारण्याचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. अधिवेशनात शिवनेरीच्या विकासासाठी 23 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून किल्ल्यावर व पायथ्याशी सार्वजनिक बांधकाम, पुरातत्व विभाग, वनविभागाच्या माध्यमातून विविध कामे होणार आहेत. शिवनेरी रोप-वे सर्वेक्षणासाठी 2.50 कोटी मंजूर झाले आहेत. नगरपरिषदेअंतर्गत कामांसाठी नगराध्यक्ष शाम पांडे यांनी केलेल्या मागणीनुसार 10 कोटी मंजूर केले आहेत.
यशवंतराव चव्हाण स्मारक व पर्यटन केंद्र येडगाव येथे सर्वेक्षण संकल्पनाचा अंदाजपत्रके तयार करण्यासाठी व खासगी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यासाठी 3 कोटी, बिगर आदिवासी क्षेत्रातील रस्ते व पुल यासाठी 32 कोटी 57 लाख 81 हजार, आदिवासी क्षेत्रातील विकास रस्ते व पूल कामांसाठी 20 कोटी 87 हजार, बांधकाम विभागाअंतर्गत 2515 हेडमधून 4.63 कोटी, बारव येथे आदिवासी मुलांसाठी शासकीय वसतिगृह बांधकामासाठी 2.5 कोटी, ग्रामीण रूग्णालय नारायणगाव यास उपजिल्हा रूग्णालय दर्जा मिळून 100 खाटांचे हॉस्पिटल व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 खाटांच्या इमारत बांधकाम करण्यासाठी 14 कोटी, दलित वस्ती-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास अंतर्गत विविध विकासकामांसाठी 1.5 कोटी, चिल्हेवाडी पाइपलाइनसाठी 25 कोटी, आयटीआय भोरवाडी (येडगावसाठी) 35 कोटी, श्रीक्षेत्र ओझर गणपती विकास आराखडाकरिता 40 कोटी पैकी 25 कोटी, आणि श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती विकास आराखडा करीता 40 कोटी पैकी 25 पैकी असा एकुण 224.57 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे.
कुकडी प्रकल्पातून जामखेड तालुक्यातील सीना नदीत पाणी सोडण्याचा निर्णय 2018 रोजी भाजपच्या आमदारांनी घेतला आहे. माजी आमदार सोनवणे यांनी त्यावेळी क्षेत्र वाढीसाठी विरोध का केला नाही. डिंभा धरणातून वाहून जाणारे अतिरिक्त 9 टीएमसी पाणी माणिकडोह धरणात पाइपलाइनद्वारे आल्यास जुन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल.
मात्र, सोनवणे यांनी त्यांच्या काळात प्रस्तावित केलेली 28 मीटर खाली पाइपलाइन ही चुकीची असून याचा फायदा तालुक्याला होणार नाही. उलट 4.5 टीएमसी पाणी गळतीमध्ये जाईल. त्यामुळे या निर्णयास विरोध करून मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 28 मीटर खाली पाइपलाइन नेण्याच्या निर्णयास विरोध करून पुन्हा सर्वे करून फेरप्रस्ताव तयार करण्यात येईल.
ओतूर जवळील डुंबरवाडी येथील कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर असलेला टोलनाका बंद करणे तांत्रिकदृष्टया शक्य नाही. मात्र, जुन्नर तालुक्यातील सर्व वाहन चालकांना टोलनाक्यातून सवलत दिली आहे.
शरद सोनवणेंकडून राजकीय भंपकपणा
बारामती येथे शिवसृष्टी हलविण्यात आल्याचा आरोप चुकीचा असून माजी आमदार शरद सोनवणे हे जाणीवपूर्वक अकलेचे तारे तोडत दिशाभूल करीत आहेत. बारामती येथे शिवसृष्टी हा विचाराधीन आहे. अद्याप मान्यता नाही; मात्र सोनवणे हे अजित पवार यांच्यावर जाणीवपूर्वक टीका करीत आहेत. ती टीका आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार अतुल बेनके यांनी दिला. सोनवणे यांनी नागरिकशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे.