राज्य परीक्षा परिषदेचे आदेश : अतिरिक्त तासिका घेण्याच्याही सूचना
पुणे – करोनाच्या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संस्था 31 मार्चपर्यंत बंद देण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेशही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी संबंधित संस्थांना बजाविले आहेत.
महाराष्ट्र व गोवा राज्यातील शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संस्थांवर परीक्षा परिषदेचे नियंत्रण असते. या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. आता या संस्थामधील गर्दी टाळण्यासाठी संस्था बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संस्थांच्या प्राचार्यांना दिल्या आहे. या सुट्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून नंतर रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त तासिका घेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्यात यावा, असे सुपे यांनी आदेशात नमूद केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वित्त व कार्यकारी समितीची सभा बुधवारी (दि.18) होणार होती. मात्र, ही सभा रद्द करण्याची मागणी समितीच्या काही सदस्यांकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेत सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
तज्ज्ञांची कार्यशाळाही रद्द
इयत्ता पाचवी व आठवीसाठी 16 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखन व काही चुका झाल्या होत्या. त्यावर ऑनलाइन लिंकवर आक्षेप मागवण्यात आले होते. मोठ्या संख्येने आक्षेप दाखल झाले आहे. या तपासणीसाठी 15 विषय तज्ज्ञांची कार्यशाळा 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी पुण्याबाहेरील विषय तज्ज्ञांनाही पत्र पाठवण्यात आली होती. मात्र, काही तज्ज्ञांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कारणे सांगून येण्यास नकार दिला आहे. यामुळे ही कार्यशाळा रद्द करण्यात आली आहे. आता ही कार्यशाळा पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.